श्री नृसिंह सरस्वती : Shri Nrusinh Saraswati
श्री नृसिंह सरस्वती - Shri Nrusimha Saraswati

श्री नृसिंह सरस्वती : Shri Nrusinh Saraswati

श्री नृसिंह सरस्वती

श्री नृसिंह सरस्वती

श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदत्तप्रभूंचा दुसरा अवतार. ‘कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:’ अशी या अवताराची ख्याती आहे.

श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत.

तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले. 

श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे.

श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे.

प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. 

श्रींचा जन्म व बालपण 

पूर्वावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपाशीर्वादाने शनिप्रदोष व्रत करून शिवोपासना करणारी कुरूगड्डीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात, लाडाचे कारंजा नगरात वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणाची सुकन्या होऊन जन्माला आली.

याही जन्मी तिचे नाव ‘अंबा’ असेच ठेवण्यात आले.

पूर्वसंस्कारानुरूप ती या जन्मीसुद्धा शिवभक्ती करू लागली.

त्याच ग्रामातील माधव नामक शिवोपासक तरुणाशी तिचा विवाह झाला. विवाहोत्तर तिचे मूळचे ‘अंबा’ हेच नाव कायम ठेवण्यात आले.

हे ईश्वर-निष्ठदाम्पत्य श्री शिवोपासनेत मग्न असतानाच;

श्रीदत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला, शनिवारी माध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला- हेच श्री नृसिंह सरस्वती होत. 

जन्म होताचि ते बालक । ॐ कार शब्द म्हणतसे अलौकिक 
पाहून झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तये वेळी ॥

जन्मताच ते ॐचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.

जन्मताच ते ॐचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.

तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले.

हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले. 

बाळाने नाना चमत्कार करून दाखविले.

याच्या स्पर्शाने आईच्या स्तनांतून अमाप दूध स्रवत असे. कौतुकात बाळ वाढू लागले.

पण वय वाढत चालले तरी ॐकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे.

हा मुलगा मुका निघणार की काय ? अशी शंका आली.

सात वर्षांपर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला.

पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार, म्हणून सर्वांना काळजी होती.

अशाच चिंतेत असताना एकदा ममतेने विचारले तू केव्हा बोलशील ? तेव्हा त्यांनी खूण करून सांगितले व्रतबंध करावा मग मुहूर्त पाहून व्रतबंध करण्याचे ठरले.

यथाविधी(इ. स. १३८५)  नरहरीचा व्रतबंध करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला.

या वेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला, ‘अग्निमीळे पुरोहितं’ या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले.

यजुर्वेद, सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली.

मातेला बाळाने एक भिक्षा मागितली,

‘निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥’ (११.८३)

वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यांस दु:ख झाले.

पुत्र रक्षक होईल, या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली. आईचे दु:ख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले.

तिला आणखी चार पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली.

या श्रीपादरूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले.

मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले.

पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते एक वर्ष करंज ग्रामातच राहिले.

मातेला आणखी दोन सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले.

स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले. 

श्रीगुरुंचे काशीक्षेत्री प्रयाण 

वयाच्या आठव्या वर्षी माता-पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले.

श्री क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले.

या बाल ब्रह्मचारी साधूची ती भक्तियुक्त पण कठोर साधना, तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहानथोर, विद्वान पंडित, आबालवृद्ध आश्चर्यचकित झाले.

सर्वजण त्यांना विनम्रभावाने नमस्कार करू लागले; पण इच्छा असूनही संन्यासी लोकांना नमस्कार करता येईना.

म्हणून काशीतील तत्कालीन ख्यातकीर्त, सर्वश्रेष्ठ, वयोवृद्ध संन्यासी श्रीकृष्णसरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली.

पितृतुल्य ऋषितुल्य श्रीकृष्णसरस्वती स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यासदीक्षा स्वीकारली.(इ. स. १३८८ )

वृद्ध श्री कृष्णसरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली.

त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे ‘श्री नृसिंहसरस्वती’ असे नूतन नामकरण केले.

लवकरच त्यांनी श्री क्षेत्र काशीचा निरोप घेतला.

ते श्री क्षेत्र प्रयागला त्यांचे तीन वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांना अनेक शिष्य लाभले.

यांपैकी सात जणांना त्यांनी विधियुक्त संन्यासदीक्षा दिली. माधवसरस्वती, बाळकृष्ण – सरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती, कृष्णसरस्वती, आणि सिद्धसरस्वती हे सात शिष्योत्तम होत.

उत्तरेकडील वास्तव्य संपवून ते सप्त शिष्यांसह दक्षिणेकडे वळले.

निरनिराळ्या तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या.

तब्बल तीस वर्षांनी ते मार्गदर्शनार्थ स्वगृही करंजनगरला परतले.

करंजग्रामातील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

संन्यासी बनलेल्या अलौकिक बाळाच्या मंगल दर्शनाने माता-पिता कमालीचे आनंदित झाले.

त्यांनी मातापित्याला प्रेमाने आलिंगन दिले. त्यावेळी उभयतांची काया तेजाळून ते खऱ्या सुखाचे अधिकारी बनले. 

काही दिवस करंजपुरीत राहून ते लोकोद्धारासाठी पुनश्च बाहेर पडले.

वाढत जाणाऱ्या जनसंपर्कापासून थोडे दिवस दूर राहण्यासाठी ते वैजनाथ येथे एक वर्ष गुप्त राहिले.

एकांतवासाचे सुख उपभोगू लागले. सेवेला सिद्धसरस्वती नावाचे शिष्य होते.

श्रीगुरूंच्या गुप्त रहिवासात एक उत्कट जिज्ञासेचा ब्राह्मण त्यांच्या दर्शनासाठी आला; पण वर्षभर त्याला दर्शन झाले नाही. सिद्धसरस्वतींनी त्याला ‘गुरुचरित्र’ सांगितले.

आजच्या लोकप्रिय गुरुचरित्राचा निम्मा भाग अशा रीतीने वैजनाथ येथे तयार झाला. 

एका वर्षाच्या गुप्त अनुष्ठानानंतर श्री गुरूंचा पुनश्च अखंड संचार सुरू झाला.

कृष्णातिरी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीसन्निध असलेल्या श्री क्षेत्र औदुंबरी(इ. स. १४२१) त्यांनी एक चातुर्मास वास्तव्य केले.

आपल्या ‘विमल पादुका ‘ स्थापन करून वाडीला गमन केले होते.तिथून ते कृष्णा-पंचगंगा संगमावर राहिले.

श्री क्षेत्र नरसोबावाडी ही तर श्री ‘दत्तप्रभूंची राजधानी’ च म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीमत्‍ वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज म्हणतात – 

“नरसोबावाडी जे लोकमान्या । कृष्णातीरी शोभवी जे धन्या ॥
अन्या तैसी देखीली म्या न साची । श्री दत्ताची राजधानी सुखाची ॥”

श्री नृसिंह सरस्वतींनी या ठिकाणी बारा वर्षे तपश्चर्या केली. या ठिकाणी त्यांनी अनेक लीला केल्या.

म्हणूनच त्यांच्या नावावरून या स्थानाला ‘नृसिंहवाडी’ किंवा ‘नरसोबावाडी’ असे नाव पडले.

श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजे दत्तभक्तांचे हृदयच!

हे तीर्थक्षेत्र म्हणजे भूत, प्रेत, पिशाच्चांचे कर्दनकाळच ठरलेले आहे. लाखो भक्तांनी इथे प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नयन करून घेतले आहे. 

तिथे त्यांचे बारा वर्षे म्हणजे एक तप वास्तव्य होते. ‘मनोहर पादुका’ स्थापून त्यांनी त्या स्थानाचा निरोप घेतला.  (इ. स. १४२२ ते  १४३४)

तिथून ते भीमा-अमरजा संगमावर श्री क्षेत्र गाणगापूरला आले. (इ. स. १४३५ ते  १४५८ )

तिथे त्यांचे तेवीस वर्षे वास्तव्य होते. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला.

श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तांची काशी ठरली. दत्तभक्तांची पंढरी झाली.

श्री गुरु औदुंबरतळीच का निवास करतात?

याही प्रश्नाचे उत्तर श्रीगुरुचरित्राच्या एकोणिसाव्या अध्यायात आलेले आहे.

नृसिंह अवताराच्या वेळी हिरण्यकशिपूच्या उदरविदारणामुळे भगवंताच्या हातांची, नखांची आग होत राहिली; ती उंबराच्या फळात हात खुपसल्यावर शमली.

म्हणून शीतल उपचारांचे प्रतीक म्हणून औदुंबराची ख्याती श्रीगुरूंच्या संदर्भात झाली.

अमरेश्वराजवळच्या चौसष्ट योगिनी श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी माध्यान्ह समयी येत.

येथेच गंगानुजावर कृपा करून श्रीगुरूंनी त्याचेही दैन्य हरण केले.

औदुंबर हा कल्पवृक्ष आहे; आपल्या मनोहर पादुकाही तेथेच आहेत, तुम्ही तेथेच वास करावा असे सांगून श्रीगुरू भीमातीरी असलेल्या गाणगापूर या गावी येऊन स्थिरावले.

अवतार समाप्ती 

प्रदीर्घ काळ भक्तकार्य करून श्री नृसिंहसरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले.

भीमा-अमरजा संगम हा गंगायमुनांचा संगम आहे. इथे नित्य स्नान करा.

सत्त्वस्थ भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वत्थाची नित्य पूजा करा. ‘या कल्पतरूच्या छायेत जो उपासना करील तो कृतार्थ होईल’, अशी अभय वाणी उच्चारून ते महाप्रस्थानास सिद्ध झाले. 

श्री सद्‍गुरू नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली.

केळीच्या पानांवर फुलांचे आसन रचण्यात आले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले.

श्री गुरूदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्यांचे, भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले.

मार्गस्थ होताना त्यांनी ‘सुखधामी गेल्यानंतर चार पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो.’

असे सांगितले त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आली.

श्री नृसिंहसरस्वती अवतार समाप्ती

ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारातून चालू होती, त्या काळात श्री नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले.

या भक्तिचंद्राला, धर्मसूर्याला भक्तिभावपूर्वक कोटी कोटी प्रणिपात!

Leave a Reply