श्री गुरुचरित्रातील गाणगापूर माहात्म्य  – Ganagapur Dattatreya Temple
gangapur

श्री गुरुचरित्रातील गाणगापूर माहात्म्य  – Ganagapur Dattatreya Temple

Ganagapur Dattatreya Temple

गाणगापूर चे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढीलप्रमाणे वर्णन आढळते.

श्री गुरुनृसिंह सरस्वती । अवतार असे त्रिमूर्ती
गाणगाग्रामी असे ख्याती । जे जाती तया स्थाना
तात्काळ होती मनोकामना । काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे ||

गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार “श्री नृसिंह सरस्वती” महाराज यांनी २२ ते २३ वर्ष वास्तव्य केले.

निर्गुण पादुका
निर्गुण पादुका

या संपूर्ण क्षेत्रामध्ये, संगम स्थान (भीमा +अमरजा नदी संगम), निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे, या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे.

तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्र्वर हे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे.

नामधारकाने सिद्धयोग्यांना वंदन करून विचारले, “श्रीगुरूनृसिंहसरस्वती हे त्रैमूर्तीचा अवतार आहेत. या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे असताना ते गाणगापुरास येउन का राहिले?

या गाणगापुर क्षेत्राचे काय माहात्म्य आहे? ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे. ते मला सविस्तर सांगा.”

नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना आनंद झाला.

ते म्हणाले, “नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. मी त्याचे उत्तर देतो. लक्षपूर्वक ऐक.

एकदा अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाल होता. त्यावेळी श्रीगुरु शिष्यांना म्हणाले, “गया-प्रयाग-वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते, तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊ या.

तुम्ही तुमच्या बायकामुलांनाही बरोबर घ्या. सर्वांनाच मोठा पुण्यलाभ होईल.” शिष्य म्हणाले, “ठीक आहे.

आम्ही घरी जातो व सगळी तयारी करतो.” त्यावर श्रीगुरू म्हणाले, “अरे, तयारी कसली करता ? सगळी तीर्थे तर आपल्या गावाजवळच आहेत. त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही.

चला माझ्याबरोबर. मी तुम्हाला सर्व तीर्थे दाखवितो.”

असे सांगून श्रीगुरू सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा-अमरजा संगमावर गेले.

तेथे सर्वांनी स्नान केले.

त्यावेळी श्रीगुरू सर्व शिष्यांना म्हणाले, “या संगमाचे माहात्म्य फार मोठे आहे. येथे स्नान केले असता प्रयागस्नानाचे पुण्य लाभते. येथे भीमा नदी उत्तरवाहिनी असल्याने ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे.

येथे अष्टतीर्थे आहेत. त्यामुळे येथे आले असता काशीक्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो.”

श्रीगुरुंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला.

ते म्हणाले, “स्वामी, ‘अमरजा’ नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला ‘अमरजा’ असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे.”

श्रीगुरू म्हणाले, “पुराणात या नदीच्या उत्पंत्तीची कथा आली आहे. पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले.

त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले.

त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला.

त्या जालंधराच्या सैन्येतील जे दैत्य जखमी होत असत त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले.

त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला. त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व दैत्यांपासून देवांना वाचवा.” अशी विनंती केली.

इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकरांनी रौद्ररूप धारण करून ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले. त्यांनी अमृतमंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला.

शंकरांनी जालंधराचा पराभव केला. इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले.

त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली.

ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच ‘अमरजा’ असे म्हणतात.

या नदीत जे स्नान करतात. त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही.

ब्रह्महत्यादी महापातके नाहीशी होतात. या अमृतनदीचा भीमानदीशी संगम झाला आहे.

तो संगम प्रयागातील त्रिवेणीसंगमासमान आहे.

कार्तिक-माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता इहलोकांत सर्व सुखांचा लाभ होतो व अंती मोक्षप्राप्ती होते.

सोमवारी, सूर्यग्रहणाच्या दिवशी, संक्रातीला, सोमवती अमावास्येला तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो.

या पर्वदिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात.

ऐश्वर्ययुक्त दीर्घायुष्य लाभते. या संगमाजवळच अश्वत्थवृक्षासमोर नदीच्या तीरावर ‘मनोरथ’ नावाचे तीर्थ आहे.

त्या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. तेथेच माझे नित्य वास्तव्य असते.

तेथे ‘गरुडपक्षी’ दिसतात ही त्याची खूण आहे. जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात.

याविषयी संदेह बाळगू नये. प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिवमंदिरात जावे. तेथे संगमेश्वर आहे.

त्याची भक्तिभावाने पूजा करावी. श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे.

त्याला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावी. तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे. पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रास जावे.

अशा तीन प्रदक्षिणा घालाव्यात. मग नंदीमागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे.

असे केल्याने सर्वप्रकारचे वैभव व पुत्रपौत्रांदीचा लाभ होतो.

त्यानंतर नागेशी गावी जावे. तेथे ‘वाराणसी’ नावाचे तीर्थ आहे. तेथे प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे.

त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता.

त्याने सर्वसंगपरित्याग केलेला होता. तो सदैव शिवध्यान करीत असे.

त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत.

त्यामुळे तो देहभान विसरून गावात वेड्यासारखा फिरत असे.

गावातले लोक त्याची ‘वेडा’ म्हणून टिंगलटवाळी करीत असत.

त्याला ‘ईश्वर’ आणि ‘पांडुरंगेश्वर’ नावाचे दोन भाऊ होते. एकदा ते सर्व तयारी करून काशीयात्रेला निघाले.

त्यांनी त्या वेड्यालाही ‘आमच्याबरोबर काशीयात्रेला चल’ असे म्हटले.

तेव्हा तो शिवभक्त ब्राम्हण त्यांना म्हणाला, “तुम्ही काशीला कशाला जाता? तो काशीविश्वनाथ माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला तो दाखवीन.”

हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले.

“आम्हाला तो काशीविश्वनाथ दाखव. तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल.” असे त्याचे भाऊ म्हणाले.

त्याचवेळी तो ब्राह्मण नदीत स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्याचक्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले.

तेव्हा तो ब्राह्मण महादेवना म्हणाला, “भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्यदर्शन व्हावे अशी माझी प्रार्थना आहे.”

महादेव त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन ‘तथास्तु’ असे म्हणाले .

त्याचक्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशीविश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली.

ती नदीच्या उत्तरदिशेला आहे. भीमा-अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली.

काशीतील सर्व खाणाखुणा लोकांना दिसू लागल्या.

ते पाहून तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला, “आता यापुढे आपल्या वंशातील कोणीही काशीला जाण्याची गरज नाही. यानंतर तुमचे नाव ‘आराध्ये’ असेल.

आता येथेच पांडुरंगाची सेवा करावी.

यापुढे तुम्ही काशीयात्रेला म्हणून येथे गाणगापुरास यावे.”

श्रीगुरुंनी भीमा-अमरजा संगमाचे माहात्म्य सांगितले असता शिष्यांची व भक्तांची श्रद्धा वाढली.

तेव्हापासून सर्वजण येथेच स्नानदानादी करू लागले.

सिद्धयोगी म्हणाले, “त्यानंतर श्रीगुरू ‘पापविनाशी’ तीर्थांकडे गेले.

त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्याची सर्व पातके नाहीशी होतात.

तेथे श्रीगुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहिण होती. ती श्रीगुरुंचे दर्शन घेण्यासाठी आली.

श्रीगुरुंनी तिला विचारले, “तू पूर्वी अनेक पातके केली होतीस. ती तुला आठवतात का ?” त्या पापकर्माची फळे तुला भोगावी लागत आहेत. तुला कुष्ठरोगही झाला आहे.”

श्रीगुरुंनी असे विचारले असता ती श्रीगुरुंच्या पाया पडली व शोक करीत म्हणाली, “मी केवळ अज्ञानी आहे. मला काहीच आठवत नाही. तुम्ही जगदीश्वर आहात. माझ्या हातून कोणते पापकर्म घडले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी.”

ती असे म्हणाली असता श्रीगुरुंना तिची दया आली. ते तिला म्हणाले, “तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनवधानाने नुकत्याच प्रसूत झालेल्या मांजरीच्या पाच पिल्लांना ठार मारलेस.

आणखीही काही पापकर्मे केलीस. त्या पापकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःखे भोगावी लागत आहेत . तुला श्वेतकुष्ठ झाले आहे हेही त्या पातकांचे फळ आहे.

श्रीगुरुंनी असे सांगितले असता रत्नाबाई श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाली, “मला आता पुनर्जन्म नको. हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात शक्तीच नाही, म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. माझा उद्धार करा.”

त्यावर श्रीगुरू म्हणाले, “तू पापविनाशी तीर्थात स्नान कर. तेथे स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल. याविषयी संदेह बाळगू नकोस.”

श्रीगुरुंनी असे सांगितले असता तिने पापविनाशी तीर्थाजवळ राहून स्नान केले.

त्यामुळे तिचा कुष्ठरोग नाहीसा झाला.”

सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, ” आम्ही त्यावेळी तेथेच होतो. आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेले आहे.”

श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कल्लेश्वर देवस्थान अशा आठ तीर्थाचे व पवित्र स्थानांचे माहात्म्य सांगून सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखांचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले.

ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की, काशी, प्रयाग, गया सर्वकाही येथेच आपल्याजवळ आहे.

मग अष्टतीर्थे माहात्म्य सांगून मठात परत आले. त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली.

गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे.

Ganagapur Dattatreya Temple

ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे होत –१) षट्कुल तीर्थ, २) नृसिंह तीर्थ, ३) भागीरथी तीर्थ, ४) पापविनाशी तीर्थ, ५) कोटी तीर्थ, ६) रुद्रपाद तीर्थ, ७) चक्रेश्र्वर तीर्थ व ८) मन्मथ तीर्थ. 

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा!

याबाबत सविस्तर माहिति “श्री गुरु चरित्र” ह्य पवित्र ग्रंथात ४९ व्या अध्यायात आली आहे.

https://amzn.to/3HzTMSz

Leave a Reply