श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय २०

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥ तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं । मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥ माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून । राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥ यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष । खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥ म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा । पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥ असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर । म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥ शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती । आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥ समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर । कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥ आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? । देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥ ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती । महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥ जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी । ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥ तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ । ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥ ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां । गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥ हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा । नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥ अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी । बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥ एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस । उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥ केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी । शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥ तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां । हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥ उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी । कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥ हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें । दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥ फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती । गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥ हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण । तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥ तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी । उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥ त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें । प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥ यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर । येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥ अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं वेंचितां  न । तें न जाय अनाठायीं ॥२६॥ पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी । म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥ ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस । तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥ आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार । सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥ मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची । तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥ असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें । त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥ या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची । जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥ लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां । बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥ कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत । हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥ घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या  ला मनें । कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥ असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं । तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥ आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा। ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥ तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य । ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥ तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी । चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥ गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर । यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥ पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी । तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग  ॥४१॥ पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? । अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥ उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास । हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥ खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण । म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥ लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला । तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥ मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी । प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥ अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी । भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥ एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी । आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥ हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर । त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥ दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली । अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥ आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन । ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥ जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी । रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥ तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून । आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥ मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें । पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥ जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार । जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥ शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी । जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥ दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात । जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥ झंझावात बळावला । कडकडाट करी चपला । मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥ मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा । शेतकर्‍यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥ शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण । तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥ तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं । बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥ हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां । अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥ कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥ तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन । करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥ दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन । मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥ तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर । तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥ जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता । वाटेल तें करी   । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥ कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन । तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥ ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी । उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥ ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां । पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥ पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें । जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥ वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा । दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥ बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी । कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥ साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन । हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥ कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही । ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥ एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार । हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥७६॥ यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला । त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥ परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना । फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥ फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी । स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥ हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त । उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥ तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला । भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥ पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी । डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥ कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर । त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥ जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी । नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥ परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे । येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥ घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी । भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥ यादव म्हणे मनांत ।  भिकारी हा लोचट बहुत । नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥ त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन । सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥ दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य । फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥ तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें । तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥ हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन । आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥ कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण । श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥ पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे । श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥ ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार । तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥ त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी । रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥ ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता । कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥ भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी । होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥ पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले । तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥ यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला । तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥ संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? । कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥ तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार । माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥ तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? । ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥ फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात । तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥ रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी । यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥ परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला । ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥ सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं । फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥ तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या । विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥ विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत । तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥ आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला । तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥ समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं । निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥

भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर । त्याची तेल्हार्‍याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥ म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला । सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥ गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची । वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥ बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं । अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥ तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित । आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥ ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत । कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥ आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों । नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥ बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डाँक्टर भला । घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥ रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी । वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥ तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला । कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥ गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार । डी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥ म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला । हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥ खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत । अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥ तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण । आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥ काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला । वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥ तेल्हार्‍याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार । मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥ ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां । कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥ मी हमेश भाडें करतों । तेल्हार्‍याहून येथें येतों । वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥ बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले । तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥२९॥ मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य । प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥ बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला । म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥ हे भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण । गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥ तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला । डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥ गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर । या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥ तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें । नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥ हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली । तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥ हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार । मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥ सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला । वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥ मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें । व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥ आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा । करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥  समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत । मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥ संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी । भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥ दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी । आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥ एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार । तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥ त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला । बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥ दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें । वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥ मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना । ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥ वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी । हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥ शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर । उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥ ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां । शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥ येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार । पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥ दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ । घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥ हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें । मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥ ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं । घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥ आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास । शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥ तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला । मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥ माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत । तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥ अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन । हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥ पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी । तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥ अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी । नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥ त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला । मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥ नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी । तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥ समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? । सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥ दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत । नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥ दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा । आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥ कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची । ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥ ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर । प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥ लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी । प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥ मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती । तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥ तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर । औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥ थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला । परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥ चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी । एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥ वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती । कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥ मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला । मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥ तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं । तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥ पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत । हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥ तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी । पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥७७॥ निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥ रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा । परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥ वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार । पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥ औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत । ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥ त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी । मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥ वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें । कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥ कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य । कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥ कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार । दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥ औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले । गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥ पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत । म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥ कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें । कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥ तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी । विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥ वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन । देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥ माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची । आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥ तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान । मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥ तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य । समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥ गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया । वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥ खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची । परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥ समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर । बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥ हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी । त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥ बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें । नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥ हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना । रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥ ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन । म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥ कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं । यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥ पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण । संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥ श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा । अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥ मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर । मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥ त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें । लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥ ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं । निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥ तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें । लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥ त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन । येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥ 

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏