श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय ७

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा । संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥ तुझ्या कृपेनें वानर । बलिष्ठ झाले भूमीवर । ज्यांनीं रावणाचा चक्काचूर । केला देवा लंकेवरी ॥२॥ तुझी कृपा झाल्या पाही । तो सर्वदा होतो विजयी । जें जें इच्छील तें तें नेई । काम आपलें तडीला ॥३॥ भूपतीचा वशीला । ज्यातें देवा ! लाधला । तो वंद्य होतो दिवाणाला । नीच कितीही असला जरी ॥४॥ ऐशा अमोघ कृपेला । होईन कां मी योग्य भला । याचा जों मीं विचार केला । तों ऐसें आलें कळोन ॥५॥ नाहीं ज्ञान नाहीं भक्ति । खरीखुरी हे श्रीपती । ऐसी आहे माझी स्थिति । शोचनीय पांडुरंगा ॥६॥ मन सदा आशाळभूत । तें ना कदा स्थिर होत । नाना विकल्प मनांत । येऊं लागती वरच्यावरी ॥७॥ मग ऐशा पातक्याला । केवि लाधावा वशीला । तुझा सांग जगत्पाला । हें व्यावहारिक म्हणणें असे ॥८॥ तुला आवडी पातक्याची । मनापासून आहे साची । ऐसी साक्ष पुराणाची । आहे कीं दीनबंधो ॥९॥ पुण्यवानाचें तारण । केल्या न कांहीं नवल जाण । जो पातक्यालागून । उद्धरीतसे तोच मोठा ॥१०॥ या जगतीं तुझ्याहून । मोठा नाहीं कोणी आन । देवा मम पातकालागून । किमपि आतां पाहूं नको ॥११॥ रक्षी आपला मोठेपणा । मज सांभाळी नारायणा । दासगणू शरण चरणा । आतां उपेक्षा करुं नका ॥१२॥ हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव । याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१३॥ हें पाटीलघराणें जाण । आहे अति पुरातन । घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥१४॥ पूर्वीपासून यांच्या घरीं । संत-सेवा होती खरी । आली भाग्यें जमेदारी । मग काय विचारितां ? ॥१५॥ महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस । थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥१६॥ कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका । गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥१७॥ पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहाजण । कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हता त्याचे कुशीं ॥१८॥ कडताजी पावतां मरण । साही मुलांचें संगोपन । कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥१९॥ कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत । अष्टसिद्धि सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥२०॥ पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार । याच्या पुढें साचार । कांहीं न चाले कोणाचें ॥२१॥ या खंडू पाटलाप्रती । पांच बंधु निश्चिती । गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥२२॥ आधींच पाटील जमेदार । सत्ता हातीं साचार । पैशाचा तो निघे धूर । जयाचिया सदनामध्यें ॥२३॥ बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती । कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥२४॥ उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा । म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥२५॥ नेहमीं कटकटी मारामार्‍या । शेगांवांत होती खर्‍या । पाटील एक्या मापीं सार्‍या । लोकांप्रती मोजितसे ॥२६॥ हा सज्जन साधुसंत । हें न ज्यांच्या मनीं येत । वाटेल त्या बोलती सत्य । अद्वातद्वा यथामती ॥२७॥ असो पाटीलबंधूंनीं । राउळांत येऊनी । महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरुं केलें ॥२८॥ कोणी म्हणावें पिश्यागण्या । खातोस का ताककण्या ? । ऐशा गोष्टी अति उण्या । त्यांनीं कराव्या समर्थासी ॥२९॥ कोणी म्हणावें खेळ कुस्ती । आम्हांसवें निश्चिती । तुला लोक बोलती । योगयोगेश्वर म्हणोन ॥३०॥ त्याचें दाव प्रत्यंतर । ना तरी आम्ही देऊं मार । याचा करी विचार । बर्‍या बोलानें येधवां ॥३१॥ त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें । अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित्‌ ॥३२॥ ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर । म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥३३॥ नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं । हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥३४॥ हे शक्तीनें माजलें । लक्ष्मीनें धुंद झाले । सत्तेपुढें कांहीं न चाले । येथें यांची पाटीलकी ॥३५॥ गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी । ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परम भक्त ॥३६॥ मात्र विनयाप्रती थारा । यांच्यापाशीं नाहीं जरा । शोधुनि पहा अंतरा । त्यांच्या म्हणजे कळेल तुज ॥३७॥ हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेंकरें आहेत साचीं । कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥३८॥ जमेदारा उर्मटपण । हेंच आहे भूषण । काय वाघाचें तें वजन । असावें सांग गाईपरी ? ॥३९॥ तलवारीला मऊपणा । मुळीं उपयोगी नाहीं जाणा । अग्नीनें तो थंडपणा । सांग धरावा कवण्या रीती ? ॥४०॥ गेल्यावरी कांहीं काळ । हा उर्मटपणा जाईल । पावसाळ्याचें गढूळ जल । हिंवाळ्यांत निवळ होई ॥४१॥ एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरीं । महाराजाला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥४२॥ तुला कुस्तींत करीन चीत । चाल जाऊं तालमींत । उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥४३॥ तुझें प्रस्थ माजलें बहु । तें खरें खोटें आज पाहूं । मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥४४॥ तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्यें गेले । समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥४५॥ खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून । असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥४६॥ हरी पाटील उठवावया । लागला यत्‍न करावया । परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥४७॥ घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली । पेच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥४८॥ हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? । अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥४९॥ हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी । खोडया आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥५०॥ त्याचें हेंच कारण । हा गजापरी बलवान । आम्ही जंबुकासमान । म्हणून नाहीं रागावला ॥५१॥ जंबुकाच्या चेष्टेला । गजपती न मानी भला । श्वानाचिया भुंकण्याला । व्याघ्र दे ना किंमत ॥५२॥ कांहीं असो याच्या पायीं । आतां ठेवणें आली डोई । आजपर्यंत मी नाहीं । कवणासीही नमन केलें ॥५३॥ समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला । ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥५४॥ कुस्ती हा मर्दानी । षोक श्रेष्ठ सर्वांहुनी । कृष्ण बलरामें बालपणीं । ऐशाच कुस्त्या केल्या रे ! ॥५५॥ मुष्टिक आणि चाणूर । मल्लविद्येनें परमेश्वर । वधिता झाला साचार । जे देहरक्षक कंसाचे॥५६॥ पहिली संपत्ति शरीर । दुअरें तें घरदार । तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ॥५७॥ तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातीरीं । गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥५८॥ तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें । ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥५९॥ हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज । येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥६०॥ हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास । शेगांवच्या लेंकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥६१॥ ऐसें धूर्तपणाचें बोलणें । केलें पाटील हरीनें । जे मुळांत असती शहाणे । त्यांना शाळा नको कीं ॥६२॥ असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून । अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥६३॥ ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती । हरी तूं त्या जोगडयाप्रति । कां भितोसी कळेना ॥६४॥ आपण पाटलाचे कुमार । या गांवींचे जमेदार । तें तूंच कां रे ठेविशी शिर । पदीं त्या नागव्याच्या ॥६५॥ त्या पिशाचें थोतांड । गांवीं माजलें उदंड । त्याचा पाहिजे काढिला दांड । लोकां सावध करावया ॥६६॥ ऐसें न जरी आपण केलें । तरी लोक अवघे होतील खुळे । पाटलाचें कर्तव्य भलें । गांवा हुशार करण्याचें ॥६७॥ मैंद साधूचे वेष घेती । वेडयावांकडया कृत्या करिती । बाया बापडया भोंदिती । याचा करी विचार ॥६८॥ सोन्या कस लाविल्याविना । न कळे रे सोनेपणा । तुकारामाचा शांतपणा । कळून आला उंसानें ॥६९॥ ज्ञानेश तेव्हां साधु कळला । जेव्हां रेडा बोलला । परीक्षेविण कवणाला । अस्थानीं मान देऊं नये ॥७०॥ चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची । मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥७१॥ हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला । अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥७२॥ जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची । तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥७३॥ आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर । त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥७४॥ ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले । लेंकरांचे बालिश चाळे । मनीं न आणी सुज्ञ कदा ॥७५॥ मारुती म्हणाला त्यावर । अरे हा भ्याला साचार । ऊंसाचा तो खाण्या मार । हा कांहीं तयार नसे ॥७६॥ मग म्हणाला गणपती । अरे मौन हीच संमती । त्यानें दिधली आपणाप्रति । आतां काय पहातां ? ॥७७॥ तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले । समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥७८॥ तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर । ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥७९॥ भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी । या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥८०॥ तुमचा पाटील-कुळांत । जन्म झाला आहे सत्य । तुमचें असावें दयाभूत । अंतःकरण दीनांविषयीं ॥८१॥ हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसीं । तरी हीन दीन लेखून यासी । द्यावें सोडून हेंच बरें ॥८२॥ अरे शूर जे का शिकारी । ते चाल करिती वाघावरी । उगीच बंदूक घेऊनि करीं । न मारिती नाकतोडा ॥८३॥ मारुतीनें जाळिली । रावणाची लंका भली । उगीच नाहीं चाल केली । झोंपडया पाहून दुबळ्यांच्या ॥८४॥ यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिलें सारें । गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥८५॥ म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग । यांत न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥८६॥ ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत । जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥८७॥ परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले । कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥८८॥

तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं । म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥८९॥ महाराज म्हणती पोरांला । मुलांनो ! तुमच्या करांला । असेल अती त्रास झाला । मारण्यानें मजलागीं ॥९०॥ त्या श्रमाचा करण्या नास । काढून देतों इक्षुरस । तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥९१॥ ऐसें म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला । हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥९२॥ त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनीं पहा पिळिली । आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥९३॥ श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस । तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥९४॥ लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती । योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥९५॥ पौष्टिक पदार्थें शक्ति येते । परी न ऐशी कायम टिकते । सशक्त आपुल्या राष्ट्रातें । करणें असल्या योग शिका ॥९६॥ हेंच तत्त्व सुचवावयासी । त्या पाटील अर्भकांशीं । करें काढून रसाशीं । दाविते झाले श्रोते हो ॥९७॥ समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून । खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥९८॥ दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात्‌ । त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥९९॥ ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी । ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥१००॥ मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला । परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित्‌ ॥१॥ गण्या, गजा ऐसें म्हणे । पाटील समर्थाकारणें । अरे तुरे हें बोलणें । होतें दोन ठिकाणीं ॥२॥ प्रेम आत्यंतिक जें काई । तेथें ऐसें घडून येई । आई लेंकरांमाजी होई । भाषण अरेतुरेचें ॥३॥ हा एक प्रकार झाला । आतां दुसरा राहिला । तोही सांगतों ऐका भला । सावधान चित्तानें ॥४॥ नोकर चाकर हीन दीन । यांच्या सवें जें भाषण । करिती संभावित जन । तेंही एकेरी स्वरुपाचें ॥५॥ अरे तुरे म्हणण्याची । संवय पाटला पडे साची । कां कीं रयत गांवचीं । लेकरें त्याचीं निःसंशय ॥६॥ श्रोते याच संवयीनें । खंडू पाटील गण्या म्हणे । श्रीसमर्थांकारणें । कांहीं न दुसरें कारण ॥७॥ गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणीं । पहा नारळालागुनी । वर करवंटीं खोबरें आंत ॥८॥ याच न्यायें तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा । वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥९॥ कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं । तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥११०॥ सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी । मग का रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्याच्या पुढें ॥११॥ तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृधापकाळ । नातवंडाचे बोल खेळ । पाहूं दे मज डोळ्यानें ॥१२॥ आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना । म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादें द्या मज ॥१३॥ तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ । आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥१४॥ साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं । संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥१५॥ तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणें केलें । मारुतीच्या मंदिरीं भलें । तें ऐका येणें रितीं ॥१६॥ अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां । इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥१७॥ तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती । इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥१८॥ त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर । तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥१९॥ ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्याशीं बोलले । आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥१२०॥ सत्ता धन तुझ्या हातीं । तूं प्रयत्‍नवादी असशी निगुती । मग विनंती आम्हांप्रति । कां करितोस कळेना ? ॥२१॥ धन आणि बलापुढें । अवघेंच म्हणशी बापुडें । मग कां रे हें न घडे । साह्यें धनबालच्या ॥२२॥ तुझी भव्य आहे शेती । गिरण्या दुकानें पेढया अती । तुझें न कोणी मोडती । जन शब्द या वर्‍हाडांत ॥२३॥ मग त्या ब्रह्मदेवाला । कां न आज्ञा करिशी भला ? । आपणां पुत्र द्यावयाला । हेंच कोडें पडलें मज ॥२४॥ खंडू करी भाषण । ही गोष्ट ना यत्‍नाधीन । पिकें पाण्यापासून । येती जरी जगामध्यें ॥२५॥ तरी पाडणें पाणी । मानवाच्या न करी जाणी । दुष्काळांत जमिनी । पडती उताण्या ख्यात हें ॥२६॥ मात्र पाणी पडल्यावर । कर्तृत्व आपुलें चालवी नर । तैसाच हाही प्रकार । तेथें न गती मानवाची ॥२७॥ खंडू पाडील ऐसें बोलतां । हंसूं आलें समर्था । तूं केलीस याचना आतां । मजकारणें पोराची ॥२८॥ याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख । तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥२९॥ पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी । परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठीं परमेश्वरा ॥१३०॥ तो ऐकेल माझी भीड । त्याला न हें कांहीं जड । तूं घरचा आहेस धड । रस आंब्याचा द्विजां घाली ॥३१॥ हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण । आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥३२॥ हें खंडुनें ऐकिलें । घरीं येऊन सांगितलें । कुकाजीसी निवेदिलें । मंदिरींचें वर्तमान ॥३३॥ हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस । तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥३४॥ कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची । गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥३५॥ तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला । कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥३६॥ त्यानें दह्र्म केला बहू । गरीबां दिले गूळ गहूं । पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥३७॥ थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें । पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदूपरी ॥३८॥ आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण । तो सांप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥३९॥ पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी । पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥१४०॥ हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा । शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥४१॥ एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची । अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥४२॥ प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात । सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥४३॥ शास्त्री दोन मंत्री दोन । शस्त्री दोन तंत्री दोन । एकमेकांपुढें श्वान । येतां गुरगुर रोकडी ॥४४॥ तैसें झालें शेगांवांत । पाटील आणि देशमुखांत । छत्तिसाचा आंकडा सत्य । झाला न होईल त्रेसष्टाचा ॥४५॥ पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी । पाहूनिया नातवंडासी । भीमातटीं पंढरींत ॥४६॥ तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन । तो म्हणे छत्र पूर्ण । माझें आज ढासळलें ॥४७॥ ज्या चुलत्याच्या जिवावरी । मी निर्भय होतों भूमिवरी । तो आधार माझा श्रीहरी । कां रे नेलास काढून ? ॥४८॥ ऐशी संधि पाहून । बालंट आणायाकारण । पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥४९॥ तो वृत्तान्त अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत । ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥१५०॥ हा दासगणूविरचित । गजाननविजयनामें ग्रंथ । परिसा श्रोते सावचित्त । कुतर्कातें सोडोनिया ॥१५१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏