श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय १७

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला । जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥ हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर । तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥ प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं । रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥ दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर । नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥ त्या भयंकर रुपाची । भीति नसे  साची । पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥ तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया । ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥ तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत । पुरविशी भक्‍तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥ त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी । दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥ गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत । तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥९॥ चापडगांवचे बापु कृष्ण । खटाऊ शेटचें कुटुंब जाण । गोडू लालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥१०॥ जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत । त्यांचीं नांवें तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥११॥ एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ । खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यानें ठेविला ॥१२॥ एक भक्त मलकापुरीं । विष्णूसा नामें निर्धारी । त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥१३॥ त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला । हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥१४॥ तो त्या वेळीं होता जवळ । करी कारभार अंगें सकळ । विष्णूसाला होतें बळ । याच भास्कर पाटलाचें ॥१५॥ भास्कर म्हणे मलकापुरीं । चला समर्था लवकरी । भक्त विष्णूसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥१६॥ मनोरथ येथील भक्तांचे । तुम्हीं पुरविले असती साचे । आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥१७॥ तईं समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा । येत नाहीं जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥१८॥ फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील । याचा विचार करी खोल । मी न बोललों कांहीं तरी ॥१९॥ दोरीसी दिधल्या फार ताण । ती मध्येंच तुटतसे जाण । मी न हलणार येथून । तूं या फंदांत पडूं नको ॥२०॥ भास्कर बोले त्यावरी । कांहीं असो मलकापुरीं । चला विष्णूसाचे घरीं । हीच विनंति गुरुराया ! ॥२१॥ मी तुमचा लाडका । मसी धक्का देऊं नका । मी भरंवसा दिला देखा । तुम्हां घेऊनि येण्याचा ॥२२॥ ती प्रतिज्ञा माझी पुरी । तुम्हीं करावी आज खरी । चला आतां स्टेशनावरी । गाडींत बसायाकारणें ॥२३॥ ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन । मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो ! ॥२४॥ भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी । बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥२५॥ महाराज तैसेंच बैसले । ते न कांहीं बोलले । जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥२६॥ तों गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा । डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीतीं ॥२७॥ जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला । योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥२८॥ आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार । त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥२९॥ पोलिसाचा अधिकारी । तेथें आला सत्वरीं । महाराजाला धरुन करीं । खालीं ओढूं लागला ॥३०॥ अरे वेडया नंग्या पीरा । अक्कल कैसी तुज ना जरा । बायकांच्या डब्यांत खरा । येऊन कैसा बैसलास ? ॥३१॥ हिसडा देऊन त्याच्या हाता । तेथेंच बसले तत्त्वतां । अधिकार्‍याची भीति चित्ता । मुळीं न त्यांच्या वाटली ॥३२॥ मग तो अधिकारी भला । स्टेशन मास्तराकडे गेला । म्हणे डब्यापासीं आतां चला । बायकाच्या माझ्यासवें ॥३३॥ दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें । योगीराज बसलेले । बायकांच्या डब्यांत ॥३४॥ मास्तर पोलिसाच्या अधिकार्‍याला । ऐशा रीतीं बोलला । तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥३५॥ हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर । याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हांही ॥३६॥ तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी । मी दिली आहे तार खरी । येविषयीं वरिष्ठाला ॥३७॥ आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित । मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥३८॥ स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी । बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा ! ॥३९॥ तुम्हीं खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें । कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥४०॥ महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती । कायद्याप्रमाणें निश्चिती । जठार साहेबासमोर ॥४१॥ त्यांनीं फिर्याद घेतली । त्याची तारीख नेमली । शेगांवावरती भली । चौकाशीची श्रोते हो ! ॥४२॥

साहेब जठार । आले शेगांवाच्यावर । डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥४३॥ व्यकंटराव देसाई । अकोल्याचे होते पाही । तेही आले ते ठाईं । कांहीं कामानिमित्त ॥४४॥ महाराजांच्या खटल्याची । गांवीं पुकार झाली साचि । म्हणून मंडळी शेगांवाची । फार मिळाली बंगल्यावर ॥४५॥ तैं देसाई म्हणती जठरास । आज कोणता खटला विशेष । तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥४६॥ जठार म्हणाले त्यातें । याचें कारण तुम्हांतें । कैसें न कळलें ? वाटतें । हेंच मला आश्चर्य ! ॥४७॥ तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून । पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥४८॥ त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं । म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥४९॥ हें ऐकतां भाषण । व्यकंटराव झाले खिन्न । बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥५०॥ श्रीगजानन साधूची। योग्यता आहे थोर साची । मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥५१॥ तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना । तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥५२॥ खटला भरला हीच केली । पोलिसांनीं चूक भली । ती पाहिजे दुरुस्त झाली । आज आपुल्या करानें ॥५३॥ जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला । याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥५४॥ कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें। तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥५५॥ तो येऊन समर्थासी । म्हणे चला आतां कचेरीसी । अधिकार्‍यानें तुम्हांसी । मज धाडिलें बोलावण्या ॥५६॥ बर्‍या बोलानें चलावें । फजितीस ना करुन घ्यावें । ना तरी मला लागेल न्यावें । तुमच्या हाता धरुन ॥५७॥ तईं वदले गजानन । आम्ही न उठूं येथून । तुझें पहातों शिपाईपण । ये धरीं माझ्या करा ॥५८॥ शिपायाचा हात धरिला । तो ना सुटे किमपि त्याला । रक्तप्रवाह बंद झाला । त्या दाबाच्या योगानें ॥५९॥ हातासी लागली कळ । जीव झाला व्याकुळ । करुं लागला तळमळ । शिपाई तो त्याच ठाईं ॥६०॥ शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविलें वकिलाला । त्या व्यंकटराव देसायाला । समर्थासी आणावया ॥६१॥ जठार म्हणती तुम्हीं जावें । समर्थासी घेऊन यावें । लोकांसी न जमूं द्यावें । बंगल्याभोंवतीं निरर्थक ॥६२॥ इतक्यांत आला समाचार । पोलिसाचा धरला कर । बसविला एक्या जागेवर । महाराजांनीं सहज लीलें ॥६३॥ मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोलले । या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्थां धोतर ॥६४॥ ऐसी सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं । तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥६५॥ गेले नागवे कचेरीस । सवें होतां भास्करशिष्य । जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥६६॥ या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत । कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥६७॥ नागवें फिरणें हाच गुन्हा । कायद्यांनीं ठरविला जाणा । म्हणून विनंति आपणा । द्या हें सोडून नंगेपण ॥६८॥ ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून । आणि केलें हास्य वदन । उत्तर त्यासी द्यावया ॥६९॥ तुला काय करणें यासीं । चिलीम भरावी वेगेंसी । उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥७०॥ तें ऐकतां भाषण । जठार गेले विरघळोन । जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥७१॥ हा वृषभदेव भागवतीचा । किंवा शुकाचार्य साचा । किंवा वामदेवाचा । हा दुसरा अवतार ॥७२॥ हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीनन्मुक्त । नये लावितां याप्रत । गुन्हा विचारें केव्हांही ॥७३॥ जेवीं अग्नीचा अग्नीपणा । अग्नि सोडीत नसे जाणा । परी अग्निहोत्र्यांना । कुंडांत ठेवणें भाग त्यासी ॥७४॥ अग्निदेव म्हणोन । ठेविल्या कुंडावांचून । तो करील दग्ध सदन । हा दोष त्याचा नसे ॥७५॥ तैसें याचें नागवेपण । आहे अग्निचे समान । म्हणून याचा शिष्यगण । आहे अपराधी येविषयीं ॥७६॥ वस्त्ररुपी कुंडाठायीं । जरी हा ठेविला असतां पाही । तरी हरकत नव्हती कांहीं । सर्वांस सुखद होतें तें ॥७७॥ ऐसा विचार पूर्ण केला । जठरांनीं चित्तीं भला । आणि हुकूम फर्माविला । त्यांनीं पुढीलप्रमाणें ॥७८॥ महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित । भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥७९॥ म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला । ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारापुढें शेगांवीं ॥८०॥ समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हा ऐशा आग्रहासी । करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया ? ॥८१॥ भास्कर कांहीं न बोलला । मौन धरुन राहिला । तेथोन मंडळींनीं केला । ऐशा प्रकारें विचार ॥८२॥ समर्थासी अग्निरथीं । न बसवा येथून कल्पांतीं । विनाकारण कटकटी होती । तें कांहीं बरें नव्हे ॥८३॥ हा क्रम कित्येक दिवस । चालला असे शेगांवास । भक्त बैलाच्या गाडीस । बसवूं लागले महाराजा ॥८४॥ या रीतीं अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी । बापुरावाच्या सदनासी । जाऊनियां उतरले ॥८५॥ याच वेळीं यवन जातीचा । साधु महताबशा नांवाचा । होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरा सन्निध ॥८६॥ त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीतीं । जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥८७॥ अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर । बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥८८॥ तों ऐशा रीतीं घडून आलें । महातबशा येण्या निघाले । अकोल्यास याया भले । समर्थासी भेटावया ॥८९॥ अकोल्याचा मनुष्य । मध्यें भेटला रस्त्यास । जो आला होता न्यावयास । महताबशाकारणें ॥९०॥ तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं । त्या मनुष्यालागुनी । महताबशा श्रोते हो ! ॥९१॥ तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला । आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महताबशा ॥९२॥ पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून । कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरी ॥९३॥ महताबशाच्या संगातें । दोन चार यवन होते । अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥९४॥ दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महताबशा होता जेथें बसला । महाराज आले तया स्थळा । निजलीलें करुन ॥९५॥ महताबशाचे धरुन केंस । समर्थांनीं ताडिलें त्यास । त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो ! ॥९६॥ यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण । यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥९७॥ या आडदांडपणांनीं । तत्त्वघात होईल जाणी । मृत्युलोकींचे अवघे प्राणी । चिंताग्रस्त होतील ॥९८॥ तुझें महताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव । दोषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥९९॥ हा द्वेषरुपी अंधार । वाढत चालला वरचेवर । याची नाहीं तुला खबर । म्हणून तुजला ताडिलें ॥१००॥  ऐसा मिळतां इशारा । महताबशातें तोषला खरा । साधूच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥१॥ जेव्हां महताबशा तें ताडिलें । तईं संगतीचे यवन भले । कावरेबावरे होते झाले । तो प्रकार पाहून ॥२॥ महताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें । आम्हांपासीं । जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥३॥ शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून । तो द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥४॥ म्हणे उद्यां दयाघना ! । यावें तुम्हीं भोजना । या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥५॥ दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवूनी समर्थाप्रत । मोठया थाटांनीं मिरवीत । निज सदना आणिलें ॥६॥ परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं । तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥७॥ तसाच तांगा नेला परत । बापुरावाच्या सदनाप्रत । मंडळी पडली घोटाळ्यांत । समर्थें ऐसें कां केलें ? ॥८॥ काल आमंत्रण घेतलें । आज तांग्याखालीं न उतरले । याचें कारण शोधिते झाले । आपापल्या बुद्धीनें ॥९॥ त्यात होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत । मला समजलें इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥११०॥ महताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरले । भोजनाचें कां न केलें । महताबशाला आमंत्रण ॥११॥ आतां घेऊन दोघांसी । बसून एका तांग्यासी । म्हणजे ते निश्चयेंसी । उभयतांही येतील ॥१२॥ तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवीत नेलें । महताबशाला उतरविलें । मंदिराजवळील थेटरांत ॥१३॥ श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी । परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥१४॥ अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महताबशा लोकांस म्हणे । मला तुम्ही तिकिट देणें । पंजाबचें काढून ॥१५॥ तैं शेख कडू बोलला । त्या महताबशा फकिराला । तुम्ही कुरुमच्या मशीदीला । टाकून कैसें जातां हो ? ॥१६॥ ती मशीद बांधून । पंजाबाशीं जावें आपण । काम अर्धें टाकून । जाणें उचित नसे तुम्हां ॥१७॥ महताब शेख कडूशीं । बोलता झाला प्रेमेशीं । आग्रह करुं नका मशी । ये वेळीं निरर्थक ॥१८॥ गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला । आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥१९॥ समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण । होईल हें माझें वचन । सत्य तुम्ही मानावें ॥१२०॥ धर्माविषयीं द्वैत । संताठाईं नसतें सत्य । तें अवघ्यां धर्माप्रत । समसमान मानिती ॥२१॥ खुळें देऊळ मशिदीची । तुम्ही नका वाढवूं साची । ती वाढतां दोघांची । आहे हानि होणार ॥२२॥ सामान देऊळ मशिदीचें । एकची आहे साचें । आकारानें भिन्नत्व त्याचें । मानून भांडूं नये हो ॥२३॥ यवन तेवढा खुदाचा । आणि हिंदु काय भूताचा ? । पोक्त विचार करा याचा । मनुष्यपण टिकवावया ॥२४॥ तरीच होईल कल्याण । हिंदु आणि मुसलमान । हीं एकाच देवापासून । निर्माण असती जाहले ॥२५॥ धर्म बापा ज्याचा त्यांनीं । प्रिय मानावा प्राणाहूनी । परी विधर्म्यांच्या ठिकाणीं । अलोट प्रेम धरावें ॥२६॥ हें न झालें जोंवरी । सौख्य लांब तोंवरी । जा मशीद होईल पुरी । गजाननाच्या कृपेनें ॥२७॥ महताबशा निघून गेले । पुनः न इकडे परत आले । या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनीं ॥२८॥ पाहा महताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी । परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥२९॥ शाहालागीं घेतल्या । विना । भोजना न गेला योगीराणा । हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टींचे श्रोते हो ! ॥१३०॥ असो या बापुरावाची । कांता एक होती साची । तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो ! ॥३१॥ मळवट यावा घटकेंत । घटकेमाजीं कंठीं तात । घटकेमाजीं वस्त्रांप्रत । अग्नी तो लागावा ॥३२॥ बिब्याच्या पाठीवर । फुल्या याव्या अपरंपार । कधीं दांडीवरील चीर । जळून जावें अकस्मात ॥३३॥ या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी । क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥३४॥ भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला । आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥३५॥ खर्चहि झाला अतोनात । गुण न आला किंचित । अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजाननस्वामीला ॥३६॥ महाराज माझ्या कुटुंबाला । भानामतीचा त्रास झाला । केले नाना उपायाला । आतां मात्र कंटाळलों ॥३७॥ तुझीं पाउलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा ! । तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा ? ॥३८॥ ज्या दरींत पंचानन । बसला आहे येऊन । तेथेंच कां ओरडून । दिमाख दाखवावा कोल्ह्यांनीं ॥३९॥ जेथें कस्तुरी दरवळली । तेथेंच कां हो रहावी भली । गुरुराया ही ओंगळी । घाण भानामतीची ॥१४०॥ ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन । केलें निजकृपें करुन । बापुराव कांतेला ॥४१॥ त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची । नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥४२॥ असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत । नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥४३॥ त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी । जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजाननमहाराज ॥४४॥ पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले । आंतील जलालागीं भले । वरच्यावरी श्रोते हो ॥४५॥ पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्तीं । नरसिंग महाराज विचारती । अरे हें काय करतोस ! ॥४६॥ गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती । आणखी तीर्थें आहेत किती । हें पाहातों डोकावून ॥४७॥ तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण ! । या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥४८॥ त्यांनीं स्नान घातल्याविना । मी न येथून हले जाणा । ऐशा ऐकून भाषणा । कैक म्हणाले या रीतीं ॥४९॥ खरोखरी हा आहे पिसा । शेगांव नादीं लागला कैसा ! । जरा थांबा येथेंच बसा । काय करी हा पाहुं पुढें ॥१५०॥ तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित । श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥५१॥ हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरी । वर्षूं लागले पहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥५२॥ लोकां म्हणती गजानन । या रे स्नानालागून । नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥५३॥ गंगा यमुना गोदावरी । वरता आली आहे खरी । स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥५४॥ भाविकांनीं केलें स्नान । निंदकांनीं खालीं मान । घातली तो पाहून । प्रकार त्या पाण्याचा ॥५५॥ संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी। त्यांच्या वाणीलागुनी। असत्यता न दे परमात्मा ॥५६॥ स्नान होतां समर्थ उठले । पाणी पहिल्यापरि झालें । विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥५७॥ नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन । शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥५८॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । तारक होवो भवाब्धींत । भाविक भक्तांकारणें ॥१५९॥ शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏