श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय ११

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति । ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥ तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर । जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया प्रकृतीला ॥२॥ तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया । म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस ॥३॥ जैसें ज्याला वाटत । तैसें तो तुला भाग देत । नामामुळें तुजप्रत । भिन्नत्व ये ना कधींही ॥४॥ शैव तुला शिव म्हणती । ब्रह्म बोलती वेदान्ती । रामानुजांचा सीतापती । वैष्णवांचा विष्णू तूं ॥५॥ उपासनेप्रमाणें । नांवें मिळालीं तुजकारणें । परी तूं अभिन्नपणें । सर्वांठायींच गवससी ॥६॥ तूं सोमनाथ विश्वेश्वर । हीम केदार ओंकार । क्षिप्रातटाकीं साचार । महांकाल तूंच कीं ॥७॥ नागनाथ वैजनाथ । घृष्णेश्वर वेरुळांत । त्र्यंबक तुला म्हणतात । गोदावरीच्या तटाकीं ॥८॥ तूं भीमाशंकर । मल्लिकार्जुन रामेश्वर । तूं गोकर्णरुपी शंकर । तूं महादेव शिंगणापुरीं ॥९॥ त्या अवघ्यांकारण । असो माझें साष्टांग नमन । माझ्या त्रितापांचें हरण । शीघ्र करी दीनबंधो ॥१०॥ देवा तुम्ही कुबेराला । क्षणांत धनपती केला । मग माझ्याविषयीं कां हो पडला । प्रश्न तुम्हांसी गिरिजापते ? ॥११॥ बाळकृष्णाच्या सदनासी । समर्थ आले दुसरे वर्षी । त्या बाळापुरासी । दासनवमीकारणें ॥१२॥ सुकलाल बाळकृष्ण । या बाळापुरालागून । निःसीम भक्त होते दोन । त्यांची सरी न ये कोणा ॥१३॥ या वेळीं बरोबर । होते पाटील भास्कर । बाळाभाऊ, पितांबर । गणू, जगदेव, दिंडोकार ॥१४॥ उत्सव दासनवमीचा । सांग झाला तेथ साचा । दैवयोग भास्कराचा । तेथेंच आला ओढवून ॥१५॥ एक कुत्रें पिसाळलेलें । भास्करा येऊन चावलें । तेणें लोक इतर भ्याले । म्हणती आतां हा पिसाळलेला ॥१६॥ उपाय अवघे व्यावहारिक । भास्करासी केले देख कोणी म्हणती निःशंक । डाँक्‍टरा धाडा बोलवणें ॥१७॥ भास्कर म्हणे ते अवसरीं । वैद्याची ना जरुर खरी । माझा डाँक्टर आसनावरी । बैसला आहे गजानन ॥१८॥ त्याचकडे मजला न्यावें । वृत्त अवघें कळवावें । ते सांगतील तें ऐकावें । आपला हेका करुं नका ॥१९॥ गजाननाचे समोर । आणिला पाटील भास्कर । बाळाभाऊनें समाचार । अवघा समर्थांस श्रुत केला ॥२०॥ तो अवघा ऐकून । महाराज वदले हांसून । हत्या, वैर आणि ऋण । हें कोणासी चुकेना ॥२१॥ सुकलालच्या गाईठायीं । द्वाडपणा जो होता पाही । तो या भास्करें लवलाही । शेगांवीं दवडिला ॥२२॥ तें तिचें द्वाडपण । कुत्रें येथें झालें जाण । तेंच चावलें येऊन । या पाटील भास्कराला ॥२३॥ तिचा हरण्या द्वाडपणा । मशीं यानें केली प्रार्थना । इचें प्यावया दूध जाणा । ऐसा भास्कर मतलबी ॥२४॥ दूध पितां वाटलें गोड । आतां कां रे चाललें जड । नको पडदा ठेवूंस आड । वांचवूं कां मी सांग तुला ? ॥२५॥ हें कुत्रें निमित्त झालें । तुझें आयुष्य मुळींच सरलें । आतां पाहिजे प्रयाण केलें । तूं या सोडून मृत्युलोकां ॥२६॥ जरी इच्छा असेल मनीं । वांचण्याची तुजलागुनी । तरी तुझें मी यापासुनी । रक्षण वेडया करीन ॥२७॥ परी ती होईल उसनवारी । जन्ममृत्यूची बाळा खरी या अशाश्वताच्या बाजारीं । देणें घेणें चालत ॥२८॥ बोल आतां झडकर । काय तुझा विचार । ऐसी कधीं ना येणार । पर्वणी ती जाण तुला ॥२९॥ भास्कर बोले त्यावरी । मी अजाण सर्वतोपरी । जें असेल अंतरीं । आपुल्या तेंच करावें ॥३०॥ लेंकुराचें अवघें हित । माता एक तें जाणत । ऐसें एक्या अभंगांत । श्रीतुकोबा बोलले ॥३१॥ मी आपलें लेंकरुं । म्हणून विनंती कशास करुं ? । तूं अवघ्या ज्ञानाचा सागरु । अवघें कांहीं कळतें तुला ॥३२॥ ऐसें ऐकतां भाषण । संतोषले गजानन । खर्‍याप्रती समाधान । खरें बोलतां होतसे ॥३३॥ कोणी म्हणाले गुरुराया । भास्करासी वांचवा सदया । या कुत्र्यापासूनिया । तो आपुला भक्त असे ॥३४॥ महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझें अज्ञान । अरे वेडया जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ॥३५॥ जन्मे न कोणी, मरे न कोणी । हें जाणावयालागुनी । परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ॥३६॥ त्याचा उपयोग करावा । मोह समूळ सोडावा । प्रारब्धभोग भोगावा । निमुटपणें हेंच बरें ॥३७॥ संचित-प्रारब्ध-क्रियमाण । हें भोगल्यावांचून । या बद्ध जीवालागून । सुटका होणें मुळींच नसे ॥३८॥ पूर्वजन्मीं जें करावें । तें या जन्मीं भोगावें । आणि तें भोगण्यासाठीं यावें । जन्मा हा सिद्धान्त असे ॥३९॥ या जन्मीं जें करावें । तें पुढच्या जन्मास उरवावें । असे किती सांग घ्यावे । फेरे जन्ममृत्यूचे ? ॥४०॥ पूर्वजन्मीचें उर्वरित । भास्कराचें न उरलें सत्य । तो अवघ्यापून झाला मुक्त । मोक्षास जायाकारणें ॥४१॥ म्हणून आग्रह करुं नका । मार्ग त्याचा आडवूं नका । काय भास्करासारखा । भक्तराणा जन्मे पुन्हां ॥४२॥ पूर्वजन्मीचें याचें वैरी । कुत्रें होतें निर्धारीं । म्हणून तें या बाळापुरीं । चावतें झालें भास्करास ॥४३॥ त्यानें अवघा आपुला । डाव येथें साधिला । तैसा जरी शेष उरला । द्वेष मनीं भास्कराच्या ॥४४॥ तरी तो त्याचा द्वेष । कारण पुढील जन्मास । कारण होईल भास्करास । दावा आपुला उगवावया ॥४५॥ म्हणून पूर्वजन्मींचें वैर सरलें । आतां न कांहीं शेष उरलें । या भासकराकारण भलें । अवघ्या उपाधि निरसल्या ॥४६॥ आतां मी इतकेंच करितों । दोन महिने वांचवितों । याला न पिसाळूं देतों । श्वानविषापासून ॥४७॥ तें न मीं केलें जरी । हा जन्मास येईल पुन्हां परी । दोन महिने भूमिवरी । उरलें आयुष्य भोगावया ॥४८॥ ऐसें ज्ञान ऐकिलें । तें कित्येकांस नाहीं पटलें । मात्र बाळाभाऊ आनंदले । त्या बोधातें ऐकुनी ॥४९॥ भास्करा, तूं धन्य धन्य । संतसेवा केलीस पूर्ण । चुकलें तुझें जन्ममरण । काय योग्यता वानूं तुझी ? ॥५०॥ ऐसा प्रकार झाल्यावरी । मंडळी आली शेगांवनगरीं । भास्कर बोले मधुरोत्तरीं । महाराजांच्या भक्तगणां ॥५१॥ बाळापूरची हकीकत । सांगे प्रत्येका इत्यंभूत । माझी विनंती जोडून हात । हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥५२॥ महाराज लाधले शेगांवा । याचा विचार करावा । या कीर्तीचा अमोल्य ठेवा । सांभाळा स्मारक करुन ॥५३॥ त्यांना स्मारकाची जरुर नाहीं । ते पुढीलांसाठीं पाही । तें स्मारक साक्षी देई । त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥५४॥ पाहा आळंदीस ज्ञानेश्वर । समर्थ सज्जनगडावर । पवित्र केलें देहूनगर । त्या तुकोबारायानें ॥५५॥ त्यांचीं स्मारकें त्या त्या ठायां । ठेविलीं भव्य करुनिया । तोच पथ अनुसराया । तुम्हीं झटावें मनापून ॥५६॥ ऐसें प्रत्येका सांगत । भास्कर राहिला निवांत । परी त्याच्या मनांत । ऐसें आलें एकदां ॥५७॥ हे मला हो हो म्हणती । माझी ऐकून विनंती । परी शंका येत चित्तीं । हो म्हणण्याची यांची मला ॥५८॥ त्यानें एकदां ऐसें केलें । अवघ्या लोकांस मिळविलें एक्या ठायीं मठांत भले । महाराजांच्या अपरोक्ष ॥५९॥ बंकटलाल पाटील हरी । मारुती चंद्रभान कारभारी । जो खंडुजीच्या दुकानावरी । होता कारभार करीत ॥६०॥ श्रीपतराव वावीकर । ताराचंद साहुकार । आणिक मंडळी होती इतर । नांवें कुठवर सांगावीं ? ॥६१॥आ मिळवूनिया त्या लोकांला । भास्करें पदर पसरीला । माझा आतां संबंध उरला । दोन महिनेच तुमच्याशीं ॥६२॥ माझ्या मनीं ऐशी आस । समर्थांचें स्मारक खास । भव्य व्हावें वर्‍हाडास । या शेगांवामाझारी ॥६३॥ तुम्ही हें करितों म्हणा । तेणें आनंद माझ्या मना । होऊन सुखें करीन गमना । मी वैकुंठाकारणें ॥६४॥ संतसेवा कधींही । अनाठाईं जाणार नाहीं इच्छा जयाची ज्या ज्या होई । त्या, त्या संत पुरविती ॥६५॥ स्मारक ऐसें करावें । अवघ्यांनींच वाखाणावें । पाहून त्या डोलावें । प्रत्येकानें आपुल्या मनीं ॥६६॥ ऐसेंच स्मारक करण्याची । शपथ वाहा समर्थांची । ही विनंति अखेरची । माझी ती मान्य करा ॥६७॥ तें अवघ्यांनीं कबूल केलें । भास्कराचें स्थीरावलें । यायोगें तें चित्त भलें । रुखरुख मनाची संपली ॥६८॥ उत्तरोत्तर आनंदवृत्ती । भास्कराची वाढत होती । जैसीं लेंकुरें आनंदती । पुढील सणाच्या आशेनें ॥६९॥ माघ वद्य त्रयोदशीस । महाराज वदले भास्करास । चाल त्र्यंबकेश्वरास । जाऊं आपण शिवरात्रीला ॥७०॥ तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर । भवभवांतक भवानीवर । जो आहे झाला स्थीर । श्रीगोदावरीच्या तटातें ॥७१॥ तें ज्योतिर्लिंग मनोहर । करी पातकाचा संहार । नको करुंस आतां उशीर । जाऊं गंगास्नानाला ॥७२॥ भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं । पहाड एक ब्रह्मगिरी । जेथें औषधी नानापरी । बहुसाल असती उगवलेल्या ॥७३॥ त्या ब्रह्मगिरीवर स्थित । आहेत पहा गहनीनाथ । ज्यांना आहेत अवगत । गुणधर्म औषधीचे ॥७४॥ वेडया कुत्र्याच्या विषावरी । तेथें औषधी आहे खरी । तिचा उपयोग सत्वरीं । करुन पाहूं येधवां ॥७५॥ भास्कर म्हणे गुरुनाथा । आतां औषधी कशाकरतां ? । तुमची आहे अगाध सत्ता । औषधीहून आगळी ॥७६॥ आपुल्या कृपेनें भलें । विष बाळापुरींच निमालें । आयुष्याचे आहेत उरले । दोन महिने आतां कीं ॥७७॥ म्हणून वाटे मजप्रती । शेगांवींच राहूं गुरुमूर्ती । त्र्यंबकेश्वरा आम्हांप्रती । तुहीच आहांत साक्षात्‌ ॥७८॥ गोदावरी तुमचे चरण । तेथेंच मी करी स्नान । अन्य तीर्थाचें प्रयोजन । मला न आतां राहिलें ॥७९॥ ऐसी ऐकतां त्याची वाणी । समर्थ वदले हांसोनी । हें जरी खरें जाणी । तरी तीर्थमहिमा मानावा ॥८०॥ चाल नको करुं उशीर । पाहूं तो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पीतांबर । यांसही घे बरोबरी ॥८१॥ मग ती मंडळी निघाली । शेगांवाहून भली । शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वराकारणें ॥८२॥ कुशावर्ती केलें स्नान । घेतलें हराचें दर्शन । गंगाद्वारां जाऊन । पूजन केलें गौतमीचें ॥८३॥ वंदिली माय निलांबिका । तेवीं गहनी निवृत्तिनाथ देखा । तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥८४॥ हा गोपाळदास महंत । काळ्या रामाच्या मंदिरांत । धुनी लावूनी द्वारांत । पंचवटीच्या बसलासे ॥८५॥ राममंदिरासमोर । एक पिंपळाचा होता पार । शिष्यांसहित साधुवर । तेथें जाऊन बैसले ॥८६॥ गोपाळदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला । आज माझा बंधु आला । वर्‍हाडांतून गजानन ॥८७॥ जा घ्या त्यांचें दर्शन । अनन्यभावें करुन । माझी ही भेट म्हणून । नारळसाखर त्यांसी द्या ॥८८॥ हा हार घाला कंठांत । तो मी एक साक्षात् । देह भिन्न म्हणून द्वैत । आम्हां उभयतीं मानूं नका ॥८९॥ शिष्यांनीं तैसेंच केलें । दर्शन घ्याया अवघे आले । कंठामाजीं घातिले । दिलेल्या पुष्पहाराला ॥९०॥ नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामीसमोर ती पाहून गुरुवर । ऐसें बोलले भास्कराला ॥९१॥ हा प्रसाद अवघ्यांस वाटी । परी न होऊं देई दाटी । माझ्या बंधूची झाली भेटी । आज या पंचवटींत ॥९२॥ माझें येथील काम झालें । आतां नाशकाचें राहिलें । म्हणून पाहिजे तेथें गेले । धुमाळ वकीलाच्या घरा ॥९३॥ महाराज आले नाशकांत । लोक दर्शना जमले बहुत । बारीक सारीक गोष्टी अमित । तेथें असतां जहाल्या ॥९४॥ त्या अवघ्या सांगतां । विस्तार होईल उगीच ग्रंथा । म्हणून देतों संक्षेप आतां । त्याची क्षमा करा हो ॥९५॥ तेथें राहून कांहीं दिवस । महाराज आले शेगांवास । तो अडगांवीं नेण्यास । श्यामसिंग पातला ॥९६॥ त्यानें आग्रह केला फार । समर्थें दिलें उत्तर । रामनवमी झाल्यावर । येऊं आम्ही अडगांवा ॥९७॥ आतां तूं जावें परत । उगा न पडे आग्रहांत । श्यामसिंग मुळींच भक्त । निःसीम होता समर्थांचा ॥९८॥ तो आला तैसा परत गेला । आपुल्या त्या अडगांवाला । पुन्हां श्रोते येतां झाला । रामनवमीस शेगांवीं ॥९९॥ उत्सव करुन शेगांवांत । समर्थांना शिष्यांसहित । आला घेऊन अडगांवांत । हनुमानजयंतीकारणें ॥१००॥ अडगांवीं असतां समर्थस्वारी । चमत्कार झाले नानापरी । एके दिवशीं दोन प्रहरीं । भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥१॥ छातीवरी बैसून । भास्करा केलें ताडन । लोक पहाती दुरुन । परी जवळी कोणी जाईना ॥२॥ बाळाभाऊ जवळ होता । तो म्हणाला सद्‌गुरुनाथा । भास्करासी सोडा आतां । बेजार झाला उन्हानें ॥३॥ तैं म्हणाला भास्कर । बाळाभाऊ न जोडा कर । माझा हा साक्षात् ईश्वर । काय करील तें करुं दे ॥४॥ लोकांसी वाटती चापटया दिल्या । मला होतात गुदगुल्या । अनुभवाच्या गोष्टी भल्या । अनुभवीच जाणती ॥५॥ पुढें घेऊन भास्करासी । महाराज आले बिर्‍हाडासी । त्या अडगांव ग्रामासी । उतरलेल्या ठिकाणास ॥६॥ बाळाभाऊस बोलले । अवघे आतां दोन उरले । भास्कराचे दिवस भले । पंचमीला जाईल तो ॥७॥ आज मीं जें केलें कृत्य । ताडनाचें रानांत । तें कां हें तुजप्रत । आलें असेल कळोनी ॥८॥ तुजला या भास्करानीं । मारविलें होतें छत्रीनीं । शेगांवीं माझ्या करांनीं । तें आहे कां ध्यानांत ? ॥९॥ तें क्रियमाण नासावया । त्यास मीं मारिलें ये ठायां । ह्या एकाच गोष्टीवांचूनिया । अन्य नव्हता हेत कांहीं ॥११०॥ उत्सव पूर्ण झाल्यावर । त्या अडगांवींचा साचार । काय घडला प्रकार । तो आतां परियेसा ॥११॥ उत्सवाचा काला झाला । वद्य पंचमी दिवस आला । एक प्रहर दिवसाला । समर्थ म्हणती भास्करासी ॥१२॥ भास्करा तुझें प्रयाण । आज दिवशीं आहे जाण । पद्मासन घालून । पूर्वाभिमुख बैसावें ॥१३॥ चित्त अवघें स्थिर करी । चित्तीं सांठवावा हरी । वेळ आली जवळ खरी । आतां सावध असावें ॥१४॥ इतर जनांकारण । म्हणूं लागले करा भजन । “विठ्ठल विठ्ठल नारायण” । ऐसें उच्च स्वरानें ॥१५॥ हा तुमचा बंधु भला । जातो आज वैकुंठाला । त्याच्या करा पूजनाला । माळ बुक्का वाहून ॥१६॥ भास्करें घातलें पद्मासन । नासाग्रीं दृष्टि ठेवून । वृत्ति अवघ्या केल्या लीन । अंतर्मुख होऊनियां ॥१७॥ भक्त भास्करा पूजिती । माळा बुक्का वाहती । तें कौतुक पाहाती । समर्थ दूर बैसून ॥१८॥ भजन झालें एक प्रहर । माध्यान्हीस आला दिनकर । महाराजांनीं ’हरहर’ । शब्द केला मोठयानें ॥१९॥ त्यासरसा प्राण गेला । भास्कराचा वैकुंठाला । संतांनीं हातीं धरिलें ज्याला । तो पाहुणा हरीचा ॥१२०॥ लोक पुसती महाराजास । कोठें करणें समाधीस । या भास्कराच्या शरीरास । कोठें न्यावें ठेवावया ? ॥२१॥ समर्थ अवघ्यांस सांगती । द्वारकेश्वर जो पशुपती । ज्याच्या सन्निध आहे सती । तेथें ठेवा भास्कराला ॥२२॥ ऐसी आज्ञा होतां क्षणीं । विमान बांधिलें लोकांनीं । केळीचे खांब लावुनी । चहुं बाजूंस विबुध हो ॥२३॥ आंत ठेविलें कलेवर । पुढें भजनाचा होय गजर । मिरवीत आणिला भास्कर । द्वारकेश्वराचीयापासी ॥२४॥ सांगविधि समाधीचा । ते ठायीं झाला साचा । लोक म्हणती महाराजांचा । परम भक्त गेला हो ॥२५॥ दुसरे दिवसापासून । समाधीच्या सन्निध जाण । होऊं लागलें अन्नदान । गोरगरीबांकारणें ॥२६॥ स्थान द्वारकेश्वराचें । अडगांवाच्या सन्निध साचें । अंतर एक मैलाचें । गांवापासून उत्तरेस ॥२७॥ जागा द्वारकेश्वराची । परमरमणीय होती साची । झाडी चिंचवृक्षांची । होती विशेष ते ठायां ॥२८॥ निंब अश्वत्थ मांदार । आम्र वट औदुंबर । ऐसे वृक्ष होते इतर । शिवाय कांहीं फुलझाडें ॥२९॥ अडगांव अकोलीच्या मध्यंतरीं । हें ठिकाण निर्धारी । तेथें समाधि दिधली खरी । समर्थांनीं भास्कराला ॥१३०॥ दहा दिवस अन्नदान । झालें याचें वर्णन । तुम्ही नुकतेंच केलें श्रवण । संतभंडारा नांव ज्याचें ॥३१॥ चिंचवृक्षांच्या सावलींत । जेवाया बसे पंगत । तयीं कावळे अतोनात । त्रास देऊं लागले ॥३२॥ काव काव ऐसें करिती । द्रोण पात्रीचे उचलून नेती । मलोत्सर्ग तोही करिती । जेवणारांच्या अंगावर ॥३३॥ योगें लोक त्रासले । कावळ्यांस हाकूं लागले । भिल्लांनीं ते तयार केले । तीरकमटे त्या मारावया ॥३४॥ तईं बोलले गजानन । अवघ्या लोकांलागून । नका मारुं त्याकारण । अपराध त्यांचा कांहीं नसे ॥३५॥ या भंडार्‍यांत येण्याचा । हेतु इतकाच आहे त्यांचा । प्रसाद आपणा भास्कराचा । इतरांपरी मिळावा ॥३६॥ कां कीं हा भास्कर । वैकुंठीं गेला साचार । हा पितृलोकावर । नाहीं मुळींच राहिला ॥३७॥ दहा दिवसपर्यंत । प्राण अंतरिक्षांत । राहे परिभ्रमण करित । सपिंडी होता जाय पुढें ॥३८॥ त्या अकराविया दिवशीं । बली देती कावळ्याशीं । काक जेव्हां स्पर्शेल त्यासी । तेव्हांच प्राण जातो पुढें ॥३९॥ त्या बलीदानाचें । कारण भास्करा नुरलें साचें । म्हणून या कावळ्यांचें । पित्त गेलें खवळून ॥१४०॥ आत्मा या भास्कराचा । मुळींच मुक्त झाला साचा । तो पाहुणा वैकुंठीचा । झाला आहे येधवां ॥४१॥ या सोमसूर्य लोकाचें । कारण त्यासी नुरलें साचें । म्हणून पिंडदानाचें । नुरलें पाहा प्रयोजन ॥४२॥ जयाला न ऐसीं गती । त्याच्यासाठीं पिंड देती । कावळ्यांची वाट पाहाती । पिंड ठेवून कलशावर ॥४३॥ म्हणून कावळे रागावले । त्यांनीं हें जाणीतलें । भास्करानें गमन केलें । एकदम वैकुंठ लोकाला ॥४४॥ म्हणून आम्हां प्रसाद त्याचा । मिळूं द्या या भंडार्‍याचा । ऐसा विचार कावळ्यांचा । दिसतो या कृतीनें ॥४५॥ तुम्ही त्यांस मारुं नका । मीच तया सांगतों देखा । अहो जिवांनो ! माझें ऐका । गोष्ट आतां सांगतों जी ॥४६॥ तुम्ही उद्यांपासोन । वर्ज्य करा हें ठिकाण । ना तरी भास्करालागून । येईल माझ्या कमीपणा ॥४७॥ आज प्रसाद घेऊन । तुम्ही तृप्त व्हा अवघेजण । मात्र उद्यांपासून । या स्थळासी येऊं नका ॥४८॥ ऐसें महाराज बोलले । तें भाविकांसी अवघें पटलें । परि कुत्सित जे कां बसले । होते त्या मंडळींत ॥४९॥ ते एकमेकांलागुनी । म्हणते झाले हांसोनी । ही गजाननानें केली वाणी । अस्थानीं कीं निरर्थक ॥१५०॥ पक्षी कुठें कां वागतात । मानवाच्या आज्ञेंत ? । पाहूं याची प्रचीत । उद्यां मुद्दाम येऊनी ॥५१॥ हे वेडे कांहीं बोलती । भाविका नादीं लाविती । आपलें स्तोम माजविती । संतत्वाचें निरर्धक ॥५२॥ अहो साजेल तें बोलावें । जें कां पचेल तेंच खावें । उसनें न कधीं आणावें । अवसान तें अंगांत ॥५३॥ दुसरे दिवशीं ते कुत्सित । मुद्दाम पाहाया आले तेथ । तों एकही ना दृष्टीप्रत । पडला त्यांच्या कावळा ॥५४॥ मग मात्र चकित झाले । समर्थांसी शरण आले । बारा वर्षें तेथ भले । कावळे न आले श्रोते हो ॥५५॥

चौदा दिवस झाल्यावरी । गजानन फिरले माघारीं । येते झाले शेगांव नगरीं । आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥५६॥ श्रोते त्या शेगांवांत । एक गोष्ट घडली अघटित । ती ऐका सावचित्त । सांगतों मी येधवां ॥५७॥ होतें साल दुष्काळाचें । म्हणून एका विहिरीचें । काम चाललें खोदण्याचें । सुरुंगातें लावून ॥५८॥ विहीर दोन पुरुषावर । गेली खोल साचार । खडक काळा लागला थोर । गती खुंटली पहारीची ॥५९॥ म्हणून भोकें करुन । आंत दारु ठासून । सुरुंगांच्या साह्यें करुन । काम फोडण्याचें सुरुं झालें ॥१६०॥ चारी बाजूंस भोकें चार । केलीं पहारीनें तयार । दारु ठासिली अखेर । आंत दोर्‍या घालुनी ॥६१॥ एरंड पुंगळ्या पेटवून । सोडल्या चारी दोर्‍यांतून । तों मध्येंच बसल्या अडकून । दोर्‍याचीया गांठीवरी ॥६२॥ पुंगळी खालीं जाईना । दारुस विस्तव लागेना । पाणी दम धरीना । आलें जवळी सुरुंगाच्या ॥६३॥ तैं कामावरचा मिस्तरी । विचार करी अंतरीं । सुरुंगास लागल्या वारी । सुरुंग वायां जाईल कीं ॥६४॥ म्हणून गणू जवर्‍याला । मिस्तरी तो बोलला । तूं उतरुन विहिरीला । पुंगळ्या थोडया सरकीव ॥६५॥ आणि तूं येईं लौकर वरी । पुंगळ्या जातील तोंवरी । बाराचिया शेजारी । म्हणजे काम होईल ॥६६॥ त्या पुंगळ्या सरकावण्यासी । कोणी न धजे जावयासी । म्हणून या गणू जवर्‍यासी । मिस्तरीनें दटाविलें ॥६७॥ काय करितो बिचारा । दारिद्रय होतें ज्याच्या पदरां । त्याच्यावरी चाले जोरा । यज्ञास बळी बोकडाचा ॥६८॥ या गणू जवर्‍याची । निष्ठा समर्थावरी साची । आज्ञा होतां मिस्तरीची । गणू आंत उतरला ॥६९॥ एक पुंगळी सरकविली । ती तात्काळ तळा गेली । दारुप्रती जाऊन भिडली । गणू आंत सांपडला ॥१७०॥ दुसरीस जों घाली हात । पुंगळी सरकवण्याप्रत । तों पहिला सुरंग उडाला सत्य । मग काय विचारतां ? ॥७१॥ गणू म्हणे विहिरींतून । समर्था ये धांवून । माझें आतां रक्षण । तुझ्यावीण कोण करी ? ॥७२॥ विहिरीमाजीं धुराचा । डोंब झाला होता साचा । दुसरा सुरुंग पेटण्याचा । अवधि उरला थोडका ॥७३॥ तों गणू जवर्‍या भली । कपार हातां लागली । त्या कपारींत बैसली । स्वारी गणू जवर्‍याची ॥७४॥ एकामागून एकांनीं । पेट घेतला सुरुंगांनीं । उडाले सुरुंग ऐसे तिन्ही । दगड अपार निघाले ॥७५॥ छिन्न भिन्न शरीर । झालें असेल साचार । डोकावून पाहाती नारीनर । आंत गणू जवर्‍याला ॥७६॥ तो कोठें दिसेना । जनाच्या नाना कल्पना । दगडाप्रमाणें गणू जाणा । उडाला असेल बाहेर ॥७७॥ त्याचें आसमंत भागांत । कोठें तरी असेल प्रेत । पडलेलें त्या शोधण्याप्रत । माणूस कोणी पाठवा ॥७८॥ मिस्तरीचा शब्द ऐकिला । आंतून गणू बोलला । अहो मिस्त्री नाहीं मेला । गणू आहे विहिरींत ॥७९॥ गजाननाच्या कृपेनीं । मी वांचलों या ठिकाणीं । बसलों आहे दडोनी । या पहा कपारींत ॥१८०॥ परी कपारीच्या तोंडाला । धोंडा एक मोठा पडला । त्यामुळें बाहेर मला । येतां येत नाहीं कीं ॥८१॥ गणूचे शब्द ऐकिले । लोक अवघे आनंदले । लोक खालीं उतरले । तो धोंडा काढावया ॥८२॥ दहापांच जणांनीं । धोंडा सरकविला पहारींनीं । गणूस बाहेर काढूनी । घेऊन आले वरते त्या ॥८३॥ वरतीं येतांच गांवांत । गणू गेला पळत पळत । समर्थांच्या मठांत । दर्शन त्यांचें घ्यावया ॥८४॥ गणू दर्शना येतांक्षणीं । बोलले त्या कैवल्यदानी । गण्या कपारींत बैसोनी । किती धोंडे उडविलेस ? ॥८५॥ त्यांत मोठा धोंडा तुला । रक्षण्यास येऊनी बैसला । कपारीच्या तोंडाला । म्हणून तूं वांचलास ॥८६॥ पुन्हां ना ऐसें साहस करी । पुंगलीवरुन सुटल्यापरी । मधेंच तिला जाऊन करीं । कशाही प्रसंगीं धरुं नये ॥८७॥ जा तुझें गंडांतर । आज निमालें साचार । गणूप्रती पाहाया इतर । लोक आले गांवींचे ॥८८॥ गणू म्हणे सद्‌गुरुनाथा । सुरुंग चारी पेटतां । तूंच मला देऊन हातां । कपारींत बैसविलें ॥८९॥ म्हणून मी वांचलों । तुझे पाय पाहाया आलों । ना तरी असतों मेलों । विहिरीमाजीं गुरुराया ! ॥१९०॥ ऐसें गजाननकृपेचें । महिमान आहे थोर साचें । तें साकल्य वर्णण्याचें । मसीं नाहीं सामर्थ्य ॥९१॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । आल्हादवो भाविकांप्रत । हेंच इच्छी दासगणू ॥१९२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏