श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय ६

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी । अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥ त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा । मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥ 

आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष । आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥ म्हणोन हे माधवा ! । अभिमान माझा धरावा । रोष कधीं ना करावा । या अजाण लेंकरावर ॥४॥ बालकांचें हीनपण 

। मातेलागीं दूषण । हें मनांत आणून करणें असेल तें करी ॥५॥ असो बंकटलाला घरीं । राहिली समर्थांची स्वारी । तयीं अपूर्व एक घडली खरी । गोष्ट श्रोते ती ऐका ॥६॥ गांवाचिया दक्षिणेस । बंकटलालाच्या मळ्यास ।

महाराज गेले एक दिवस । कणसें मक्याचीं खावया ॥७॥ बहुत मंडळी बरोबरी । कणसें खाया आली खरी । विहिरीपासीं तयारी । केली कणसें भाजण्याची ॥८॥ विहीर होती धनत्तर । पाणी जिला अपरंपार । गर्द छायेचे वृक्ष 

थोर । जवळ होते चिंचेचे ॥९॥ आगटया पेटल्या एकसरां । आजमासें हो दहा बारा । तेणें डोंब झाला खरा । गगनोदरीं धूमाचा ॥१०॥ त्यायोगें ऐसे झाले । आग्या मोहोळ लागलेलें । चिंचवृक्षावरी भलें । त्याच्या माशा 

उठल्या कीं ॥११॥ त्या माशा उठतां क्षणीं । मंडळी गेली पळोनी । कणसें ठिकाणच्या ठिकाणीं । मक्याचीं तीं राहिलीं हो ॥१२॥ त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका । पसरल्या अवघ्या मळ्यांत देखा । घोंगडयाचा करुन बुरखा 

। कोणी गेले पळून ॥१३॥ प्राणापरी आवडती । वस्तु नसे हो कोणती । अशा वेळीं समर्थमूर्ति । आसनीं होती निर्धास्त ॥१४॥ ते नाहीं पळून गेले । आसनीं आपल्या स्वस्थ बसले । विचार करुं लागले । निजचित्तीं माश्यांचा ॥१५॥ माशी तरी मीच झालों । मोहोळ तेंही मीच बनलों । कणसें खाया मीच आलों । कणसें तेंही रुपें माझीं ॥१६॥ ऐशा विचारें आनंदांत । महाराज राहिले डोलत । अंगावरी असंख्यात । माशा येऊन बैसल्या ॥१७॥ वाटे पासोडी माश्यांची । समर्थ पांघरले साची । योग्यता ब्रह्मनिष्ठाची । काय वर्णन करावी ? ॥१८॥ माशा चावती वरच्यावरी । परी न तो पर्वा करी । त्यांचे कांटे शरीरीं । बोचले असती असंख्यात ॥१९॥ यासी झाला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर । बंकटलालाचें अंतर । दुःखें व्याकुळ झालें हो ॥२०॥ कोठून बुद्धि झाली मला । येथ आणिलें समर्थाला । कणसें मक्याचीं खावयाला । मंडळीच्या समवेत ॥२१॥ अशा समर्थालागून । दुःख द्याया मीच कारण । झालों हें कां शिष्यपण । माझे हाय रे दुर्दैवा ! ॥२२॥ बंकटलालानें तयारी । पुढें येण्याची केली खरी । हें जाणोन अंतरीं । कौतुक केलें समर्थानें ॥२३॥ जीवांनो ! जा निघोन । बसा मोहोळीं जाऊन । माझ्या बंकटाकारण । तुम्हीं न कोणीं चावावें ॥२४॥ जमलेल्या मंडळींत । बंकट हाच निःसीम भक्त । जो माझ्याप्रीत्यर्थ । येत आहे धांवोनिया ॥२५॥ ऐसें म्हणतां माशा गेल्या । मोहोळावरी जाऊन बैसल्या । बंकटलालानें पाहिल्या । त्या आपल्या निजदृष्टीं ॥२६॥ महाराज त्या पाहोनी । बोलते झाले हांसोनी । वा खूप केलीस मेजवानी । आम्हांसी तूं माश्यांची ॥२७॥ अरे ते जीव विषारी । बैसले माझ्या अंगावरी । माझ्यापासून झाले दुरी । लड्डूभक्त येधवां ॥२८॥ याचा करी विचार । संकट आल्या कोणावर । कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावांचुनी ॥२९॥ जिलबी पेढे बरफी खाती । माशा आल्या पळून जाती । ऐशी जयांची आहे कृति । ते स्वार्थी भक्त निःसंशय ॥३०॥ बंकटलाल मधुरोत्तर । करितां झाला त्यावर । महाराज आणवूं कां सोनार । कांटे माश्यांचे काढवया ! ॥३१॥ महापापी मी गुरुराया । तुम्हांलागीं त्रास द्याया । आणवितां झालों या ठायां । माशा किती डसल्या तरी ! ॥३२॥ गांधी अगणित अंगावर । उठल्या तुमच्या साचार । याचा व्हावया परिहार । उपाय सांगा कोणता ? ॥३३॥ बंकटलालाचें ऐकिलें । वचन महाराज बोलते झाले । अरे यांत ना कांहीं अधिक घडलें । डसणें स्वभाव माश्यांचा ॥३४॥ मला त्याची मुळींच बाधा । होणार नाहीं जाण कदा । त्या माशीरुप सच्चिदानंदा । म्यां जाणलें म्हणोन ॥३५॥ माशी तरी तोच झाला । तोच आहे माझा पुतळा । पाण्यानेंच पाण्याला । काय दुखवितां येईल ? ॥३६॥

हें ऐकतां ब्रह्मज्ञान । बंकटलाल धरी मौन । कांटे काढण्यालागून । बाहिलें त्यानें सोनारा ॥३७॥ सोनार चिमटे घेऊन आले । देहास शोधूं लागले । कोठें आहेत कांटे रुतले । मक्षिकेचे पहावया ॥३८॥ महारज वदले तयांना । काय ह्या वंध्यामैथुना । करितसा तुमच्या नयनां । कांटे ते ना दिसतील ॥३९॥ त काढण्या चिमटयाची । गती नाहीं मुळींच साची । साक्ष ती ह्या गोष्टीची । मीच दावितों तुम्हांला ॥४०॥ ऐसें म्हणून कौतुक केलें । वायूलागीं रोधून धरिलें । तों कांटे अवघे वरी आले । रुतलेल्या स्थलांतून ॥४१॥ तो पाहतां प्रकार । लोक आनंदले फार । कळून आला अधिकार । श्रीगजाननस्वामीचा ॥४२॥ पुढें कणसें भाजलीं । अवघ्यांनीं तीं ग्रहण केलीं । अस्तमानीं निघून आली । मंडळी निजगृहातें ॥४३॥ असो पुढें एक वेळा । महाराज गेले अकोटाला । आपुल्या बंधूस भेटण्याला । श्रीनरसिंगजीकारणें ॥४४॥ हा कोतश्या अल्लीचा । शिष्य मराठा जातीचा । कंठमणी विठ्ठलाचा । भक्‍तिबलानें झाला असे ॥४५॥ त्या नरसिंगजीचें चरित्र । मीं भक्‍तलीलामृतांत । वर्णिलें आहे इत्यंभूत । आतां तें सांगणें नको ॥४६॥ हें आकोट नामें नगर । शेगांवाहून साचार । आहे अठरा कोसांवर । ईशान्येला परियेसी ॥४७॥ मनोवेगाचा सजवून वारु । निघते झाले सद्‌गुरु । जे पदनताचे कल्पतरु । श्रीगजानन महाराज ॥४८॥ अकोटाच्या सान्निध्यासी । एका निबिडतरशा अरण्यासी । नससिंग राहे अहर्निशीं । एकान्तवास सेवावया ॥४९॥ हें निर्जन अवघें अरण्य । महा भयकंर दारुण । निंब अश्‍वत्थ रातांजन । वृक्ष जेथें उदेले ॥५०॥ लता त्या नाना जाती । वृक्षा वेढून बैसल्या असती । ण वाढलें भूमीवरती । सर्प वारुळीं असंख्यात ॥५१॥ ऐशा त्या अरण्यांत । नरसिंगजी जाऊन बसत । म्हणून आले अवचित । समर्थ त्यासी भेटावया ॥५२॥ सारखा भेटे सारख्यासी । पाणीच मिळें पाण्याशीं । विजातीय द्रव्यासी । समरसता होणें नसे ॥५३॥ गजाननासी पाहिलें । तेणें चित्त आनंदलें । मी नरसिंगजीचें भलें । तो प्रेमा न वर्णवे कीं ॥५४॥ एक हरी एक हर । चालते बोलते परमेश्‍वर । एक राम एक कुमर । वसुदेवदेवकीचा ॥५५॥ एक मुनि वसिष्ठ । एक पाराशर ऋषि श्रेष्ठ । एक जान्हवीचा कांठ । एक तट गोदेचा ॥५६॥ एक हिरा कोहिनूर । एक कौस्तुभ साचार । एक वैनतेय एक कुमर । सती वानरी अंजनीचा ॥५७॥ दोघे भेटले एकमेकां । दोघा आनंद सारखा । बैसते झाले आसनीं एका । हितगुज तें करावया ॥५८॥ अनुभव ते आपापले । एकमेकां कथिते झाले । नरसिंगा, तूं उत्तम केलें । प्रपंचांत राहिलास ॥५९॥ मीं त्याग केला तयाचा । स्वीकार करुन योगाचा ।  सच्चिदानंद तत्त्वाचा । करिता झालों विचार ॥६०॥ या योगाच्या क्रियेंत । गोष्टी होती अघटीत । ज्यांचा मुळीं न लागे अंत । या सामान्य लोकांला ॥६१॥ त्या गोष्टी लपवावया । पिसा बनलों जगा ठायां । उपाधी ते नासावया । वेड बळेंच पांघरलों ॥६२॥ तत्त्व जाणण्याकारण । मार्ग कथिले आहेत तीन । कर्म, भक्ति, योग म्हणून । शास्त्रकारांनीं शास्त्रांत ॥६३॥ फल या तिन्ही मार्गांचें । एकचि आहे अखेरीचें । परी बाह्य स्वरुप त्यांचें । भिन्न भिन्न असें कीं ॥६४॥ योगी योगक्रियेचा । जरी अभिमान वाही साचा । तरी तयासी तत्त्वाचा । खर बोध ना होईल ॥६५॥ योगक्रियावरुन । अलिप्त रहावें तयापासून । कमलपत्रासमान । तरीच तत्त्व कळून ये ॥६६॥ याचपरी प्रपंचाची । स्थिति नरसिंगा आहे साची । आसक्ति कन्यापुत्रांची । मुळींच राहतां कामा नये ॥६७॥ गार पाण्यांत राहते । परी न पाणी शिरुं देते । सेंच वागती साचें । या प्रपंचामाझारीं ॥६८॥ यापरी त्वां रहावें । अपेक्षारहित असावें । चित्तांतून ना ढळूं द्यावें । सच्चिदानंद ईशाला ॥६९॥ म्हणजे कांहींच अशक्य नाहीं । तूं, मी आणि शेषशायी । एकरुप आहों पाही । जन जनार्दन भिन्न नसे ॥७०॥ नरसिंग म्हणती बंधुराया ! । आलास मसी भेटावया । ही तुझी केवढी दया । उपमा याला देण्या नसे ॥७१॥ प्रपंच मुळीं अशाश्वत । त्याची काय किंमत । दुपारच्या सावलीप्रत । कोण सांग खरे मानी ? ॥७२॥ तूं कथिलें जयापरी । तैसा वागेन भूवरीं । मी जाण वरच्यावरी । अशीच भेटी द्यावी तुवां ॥७३॥ देह-प्रारब्ध जयाचें । असेल ज्या जातीचें । तेंच आहे व्हावयाचें । लोकाचारी निःसंशय ॥७४॥ तुम्हां आम्हांकारणें । जें का धाडिलें ईशानें । तेंच आहे आपणां करणें । निरालसपणें भूमीवरी ॥७५॥ आतां विनंति इतुकीच खरी । व्यावहारिक भेट वरच्यावरी । देत जावी साजिरी । मी धाकटा बंधु तुझा ॥७६॥ नंदीग्रामा राहिला भरत । रघुपतीची वाट पहात । तैसाच मी या आकोटांत । राहून पाहतों वाट तुझी ॥७७॥ तुला येथें यावया । अशक्य कांहीं नाहीं सदया । अवघ्या आहेत योगक्रिया । अवगत तुला पहिल्यापून ॥७८॥ पद न लावितां पाण्याप्रत । योगी भरधांव वरुनी पळत । क्षणामाजीं फिरुन येत । शोधून अवघ्या त्रिभुवना ॥७९॥ ऐसें हितगुज उभयतांचें । रात्रभरी झालें साचें । भरतें आलें प्रेमाचें । दोघांचिया संगमीं ॥८०॥ खरे खरे जे का संत । तेथें हेंच घडून येत । दांभिकांचीं होतात । भांडणें पाहून एकमेकां ॥८१॥ दांभिक म्हणूं नये गुरु । ते अवघे पोटभरु । पुरामाजीं फुटकें तारुं । तारण्यासी समर्थ नसे ! ॥८२॥ दांभिकांचा बोलबाला । जरी होतो जगीं भला । तरी त्यागणें आहे त्याला । निवडूनिया श्रोते हो ! ॥८३॥ संतत्व नाहीं मठांत । संतत्व नाहीं विद्वत्तेंत। संतत्व नाहीं कवित्वांत । तेथें स्वानुभव पाहिजे ॥८४॥ दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें । गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥ ही संतजोडी साक्षात्कारी । दांभिकतेची साच वैरी । नांदे ज्याच्या सदैव घरीं । सन्नीति सदाचार ॥८६॥ नरसिंगजीस भेटण्या जाण । काननीं आले गजानन । ऐसें कळलें वर्तमान । गुराखीद्वारें आकोटाला ॥८७॥ तें कळतां आनंदले । लोक धावूं लागले । नारळ घेऊन निघाले । पाहाया द्वय संतांसी ॥८८॥ एकमेकां ऐसें म्हणती । चला चला रे सत्वर गती । गोदा आणि भागीरथी । संगम पावली काननांत ॥८९॥ त्या भेटरुप प्रयागासी । जाऊं आपण स्नानासी ।  महोदयपर्वणीसी । साधून घेऊं चला हो ॥९०॥ तों इकडे काय झालें । गजानन आधींच निघून गेले । नरसिंगासी पुसून भले । भेट ना झाली पौरांसी ॥९१॥ पुढें एकदां गजानन । करीत असतां भ्रमण । दर्यापुराच्या सन्निध जाण । येते जाहाले शिष्यांसह ॥९२॥ दर्यापुराच्या शेजारीं । शिवर गांव निर्धारी । असे चंद्रभागेच्या तीरीं । व्रजभूषणा वास जेथें ॥९३॥ श्रोते ही चंद्रभागा । पंढरीची नाहीं बघा । ही लहानशी एक गंगा । पयोष्णीला मिळणारी ॥९४॥ या शिवर गांवांत । व्रजभूषण नामें पंडित । चार भाषा अवगत । होत्या श्रोते जयाला ॥९५॥ कीर्ति ज्याच्या विद्वत्तेची । वर्‍हाडीं पसरली साची । याला भक्ति भास्कराची । आत्यंतिक असे हो ॥९६॥ प्रत्यहीं चंद्रभागेवर । स्नान करी साचार । उदयास येतां दिनकर । अर्घ्य त्यासी देतसे ॥९७॥ पंच पंच उषःकाला । व्रजभूषण उठे भला । सारुन प्रातर्विधीला । अरुणोदयीं स्नान करी ॥९८॥ तेंही शीतोदकांनीं । ऐसा कर्मठ परी ज्ञानी । मानमान्यता विद्वज्जनीं । ज्याची होती विशेष ॥९९॥ त्या शिवरगांवाला । योगीराज फिरत आला । वाटे तपाचें द्यावयाला । फल त्या व्रजभूषणासी ॥१००॥ चंद्रभागेच्या वाळवंटीं । हा बैसला ज्ञानजेठी । समोर नदीचिया कांठीं । आले व्रजभूषण स्नानाला ॥१॥ ती प्रभातीची वेळा पाही । प्रकाशिल्या दिशा दाही । क्कुटाचा आवाज येई । वरचेवरी ऐकावया ॥२॥ चातक भारद्वाज पांखरें । जाऊं लागलीं अत्यादरें । भास्करासी सामोरे । पूर्व दिशा लक्षून ॥३॥ भास्कराचा उदय होतां । तम निमाला हां हां म्हणतां । जैसा सभेस पंडित येतां । मूर्ख जाती उठोनी ॥४॥ ऐशा त्या सुप्रभातीं । वाळवंटीं गुरुमूर्ति । बैसली होती निश्चिती । ब्रह्मानंदीं डोलत ॥५॥ सवें शिष्य अपार । बसले होते मंडलाकार । ते शिष्य नव्हते किरणें थोर । त्या गजाननभास्कराचीं ॥६॥ तईं व्रजभूषण तत्त्वतां । झाला सूर्यासी अर्घ्य देतां । तो हा पुढें ज्ञानसविता । त्यानें पाहिला प्रत्यक्ष ॥७॥ सूर्याप्रमाणें सतेज कांति । अजानुबाहू निश्चिती । दृष्टि नासाग्राच्या वरती । स्थिर जयाची झाली असे ॥८॥ ऐसा पुरुष पाहतां क्षणीं । व्रजभूषण हर्षला मनीं । संध्यासामान घेऊनी । आला धांवून जवळ त्यांच्या ॥९॥ अर्घ्य दिलें पायांवरी । गजाननाच्या सत्वरीं । प्रदक्षणाही अखेरी । त्यानें घातली तयाला ॥११०॥ मित्राय नमः सूर्याय नमः । भानवे नमः खगाय नमः । ऐसीं नांवें घेऊन पाहा । घातले द्वादश नमस्कार ॥११॥ शेवटीं आरती ओवाळिली । गजाननासी आदरें भली । न्यूनता ती नाहीं पडली । कशाचीही त्या ठायां ॥१२॥ प्रार्थनापूर्वक नमस्कार । साष्टांग केला अखेर । मुखानें तें स्तवन थोर । महाराजाचें चाललें ॥१३॥ माझ्या तपाचरणाचें । फळ आजि मिळालें साचें । दर्शन दिव्य पायाचें । आज झालों धन्य मी ॥१४॥ नभोदरींच्या भास्कराला । देत होतों अर्घ्य भला । तों आज प्रत्यक्ष पाहिला । ज्ञाननिधि योगेश्वर ॥१५॥ (श्लोक) हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी ? । झाल्यास दर्शने तुझें भवरोगचिंता । नासे गजाननगुरो, मज पाव आतां ॥१॥ ऐसी प्रार्थना करुन । संपविलें त्यानें स्तवन । योगेश्वरें या आलिंगन । दृढ दिधलें त्या दोन्ही करें ॥१६॥ माय जैसी लेंकराला । प्रेमें धरी पोटाला । तेवीं व्रजभूषणाला । धरिते झाले महाराज ॥१७॥ 

मस्तकावरी ठेविला कर । आशीर्वाद दिधला थोर । सर्वदा तुझा जयजयकार । होईल बाळा व्रजभूषणा ! ॥१८॥ कर्ममार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको । मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ॥१९॥ आचरुन कर्मफल । टाकितां भेटतो घननीळ । त्याच्या अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही ॥१२०॥ तूं आतां आपुल्या सदनीं । माझे बोल ठेवी मनीं । प्रत्यहीं माझें तुला ध्यानीं । होत जाईल दर्शन ॥२१॥ ऐसें म्हणून प्रसाद दिला । श्रीफलाचा श्रोते भला । त्या व्रजभूषण पंडिताला । महाराज आले शेगांवीं ॥२२॥ ह्या शेगांवाचें होतें नांव । पूर्वकालीं शिवगांव । अपभ्रंशें लाधला ठाव । शेगांव या शब्दाला ॥२३॥ तेंच हल्लीं प्रचलीत । आहे बुधहो वर्‍हाडांत । सतरा पाटील होते सत्य । ह्या एकाच ग्रामाला ॥२४॥ महाराज शेगांवासी आले । परी न स्थिर राहिले । हमेशा ते भटकत फिरले । मनास येईल त्या स्थला ॥२५॥ आकोट अकोलें मलकापूर । नांवें सांगावीं कुठवर ? । चांदण्यांची न होणार । मोजदाद कोणाही ॥२६॥ ज्येष्ठ आषाढ महिना गेला । पुढें श्रावण मास आला । उत्सव होता सुरुं झाला । मारुतीच्या राऊळांत ॥२७॥ हें मारुतीचें मंदिर । शेगांवीं भव्य साचार । पाटील मंडळी थोर थोर । होती या भक्त देवाची ॥२८॥ पेंडीलागीं जैसा आळा । तेवीं पाटील गांवाला । जें जें कांहीं आवडे त्याला । तिकडे लोकांचा कल होई ॥२९॥ चाले उत्सव महिनाभर । अभिषेक पोथी कीर्तन गजर । अन्नदानाशीं येई पूर । अवघे लोक तृप्त होती ॥१३०॥ उत्सवाचा पुढारी । खंडू पाटील निर्धारी । जो गांवचा कारभारी । होता उदार मनाचा ॥३१॥ श्रोते हें पाटीलपण । आहे वाघाचें पांघरुण । तें जो घेई त्याला जन । भिऊं लागती सहजची ॥३२॥ गांव करी तें राव न करी । ऐशी मराठी भितरीं । म्हण एक आहे साजरी । ती यथातथ्य असे ॥३३॥ त्या मारुई मंदिरासी । आले गजानन पुण्यराशी । श्रावणाच्या आरंभासी । उत्सव श्रीचा पाहावया ॥३४॥ बोलले बंकटलालासी । मी आतां या मंदिरासी । राहीन जाणा अहर्निशीं । त्याचा शोक करुं नको ॥३५॥ गोसावी संन्यासी फकीर । यांना कायमचें राहण्या घर । योग्य नाहीं साचार । तुम्हां प्रापंचिकाचें ॥३६॥ मी परमहंस संन्यासी । आतां राहातों मंदिरासी । तूं बोलाविशी ज्या दिवशीं । तेवढयापुरता येईन तेथ ॥३७॥ हें अंतरींचें गुह्य तुला । कथन केलें बंकटलाला । स्वामी शंकराचार्याला । भ्रमण करणें भाग आलें ॥३८॥गोसावी मच्छिंद्र जालंदर । हेही राहिले निरंतर । प्रापंचिकाचें वगळून घर । काननामाजीं वृक्षातळीं ॥३९॥ छत्रपती राजा शिवाजी । जो रणबहादूर वीरगाजी । ज्यानें हिंदूची रक्षिली बाजी । दंडून दुष्ट यवनांना ॥१४०॥ त्या शिवाजीचें प्रेम फार । होतें रामदासावर । परी सज्जनगडावर । स्वामी होते वस्तीला ॥४१॥ याचा विचार करावा । हट्ट मुळीं ना धरावा । माझ्या म्हणण्यास मान द्यावा । यांत कल्याण तुझें असे ॥४२॥निरुपाय होऊन अखेर । देता झाला रुकार । तो बंकटलाल सावकार । गजाननाचें म्हणण्याला ॥४३॥ मंदिरीं स्वामी समर्थ येतां । हर्ष झाला समस्तां । भास्कर पाटील शुश्रूषेकरितां । जवळ राही निरंतर ॥४४॥ हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ । मुमुक्षूला दावो पथ । संतचरणसेवेचा ॥१४५॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏