श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय १५

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा । तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥ राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें । तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥ आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला । आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥ या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार । देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥ एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता । पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥ अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी । कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥ शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा । देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥ देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें । आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥ तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार । मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥ टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर । दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥ निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी । ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥ करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य । सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥ वाक्‌चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें । धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥ कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली । ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥ तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला । लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥ झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची । मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥ दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान्‌ बडेबडे । जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥ अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे । नांव ऐकतां टिळकांचें । वर्‍हाड सारें आनंदलें ॥१८॥ शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं । झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥ शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती । ती वर्‍हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥ त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला । वर्‍हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥ माता होती वर्‍हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी । अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥ आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा । आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥ आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी । ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥ अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले । तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥ या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला । श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥ शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा । समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥ टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्‍न । त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥ ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें । ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥ तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां । तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥ फिरेल नागवा सभेंत । “गिण गिण गणांत” ऐसा म्हणत । मारील वाटे कदाचित्‌ । तो लोकमान्याला ॥३१॥ कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें । गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥ त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेडयाकारण । जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥ खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक । तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥ खर्‍याखोटयाची परीक्षा । साधूच हे करिती देखा । म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥ ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली । आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥ येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी । आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥ वेडयापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं । सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥ करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर । याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥ स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा । शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥ त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास । तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥ पाहा पाहा कोल्हटकरा । वर्‍हाडप्रांताचा ज्ञानहिरा । यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥ यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें । खर्‍या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥ बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास । तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥ मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला । चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥ खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार । आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥ वर्‍हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें । कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥ शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं । वर्‍हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥ सण अक्षय्यतृतीयेचा । वर्‍हाडप्रांतीं महत्त्वाचा । परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥ तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण । लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥ शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी । ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥ मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला । म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥ परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं । साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥ सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी । गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥ सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा । त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥ श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान । खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥ दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई । सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥ आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार । त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥ सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला । मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥ “दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन । स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥ त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची । जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥ त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला । म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥ तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले । श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥ म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी । अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥ स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला । स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥ यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्‍न । ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥ ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती । तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?” ॥६७॥ ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले । गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥ आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत । जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥ त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला । आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥

अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत । ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥ सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली । खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥ भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला । दोर्‍या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥ राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें । वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥ प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची । त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥ दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे । ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥ अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं । बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥ तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी । सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥ मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें । तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥ लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त । येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥ तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते । तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित्‌ ॥८१॥ कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं । जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥ कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची । कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥ जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड । ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥ चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले । तुम्ही अलोट प्रयत्‍न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥ अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला । होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥ सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना । कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥ ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर । टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥ या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी । जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥ ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर । समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥ ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला । वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥ तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत । स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥ यश तुमच्या प्रयत्‍नासी । नाहीं निश्चयेंसी । आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥ जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो । हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥ माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी । ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥ भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन । आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥ प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी । दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥ झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास । तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥ हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी । मान जगत्‌-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥ या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार । त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥ बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी । केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥ कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर । कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥ हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी । या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥ येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर । कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥ स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते । पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥ त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥ गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई । आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥ यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर । चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥ असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्‌पावन जातीचा । श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥ तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत । आंग्‍लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥ पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला । म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥ तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र । तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥ आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला । उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥ टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून । अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥ तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें । ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥ द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत । घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥ तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्‍यासी । जो मन्‍रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥ त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला । तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥ मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें । दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥ चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला । त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥ दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त । उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥ पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं । आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥ दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत । बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥ मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा । म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेडया करुं नको ॥२४॥ अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत । सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥ त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं । कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥ ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे । बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥ तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती । याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥ ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी । हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥ अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन । या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥ तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला । योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥ तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई । ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥ पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला । विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥ एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन । कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥ महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही । कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥ जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत । तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥ श्रीधर बी.ए.एम्‌.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें । शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥ संत साक्षात्‌ ईश्वर । चालते बोलते भूमीवर । त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥ पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला । म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥ हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें । वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥ 

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏