श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय ५

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया । दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥ मी हीन दीन पातकी नर । नाहीं कोणता अधिकार । सर्व बाजूंनीं लाचार । आहें मी देव देवा ॥२॥ परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी । पाहा अंगीं लाविली खरी । विभूति श्रीशंकरानें ॥३॥ तो हीनांचा हीनपणा । थोरा न आणि कमीपणा । हें जाणोन नारायणा । गणू हा ठेवा संग्रहीं ॥४॥ सर्व लाड लेंकराचे । माता ती पुरवि साचे । आहे दासगणूचें । ओझें सर्व तुझ्या शिरीं ॥५॥ जैसें करशील तैसें करी । परी दया असूं दे अंतरीं । देवा तुझ्या बळावरी । दासगणूच्या सार्‍या उडया ॥६॥ गजानन असतां शेगांवीं । यात्रा येई नित्य नवी । ती कोठवरी वर्णावी ? । पार न लागे तियेचा ॥७॥ महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधुवर । ती उपाधी करण्या दूर । भटकूं लागले काननीं ॥८॥ महिना महिना तिकडेच राहावें । वाटेल तेथेंच बैसावें । कोणाशीं न उमगूं द्यावें । चरित्र आपुलें येतुलेंही ॥९॥ श्रोते एका समयासी । महाराज पिंपळगांवासी । गेले तेथें गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥१०॥ त्या पिंपळगांवच्या शिवारांत । होतें एक अरण्यांत । शंकराचें मंदिर सत्य । जुनें पुराणें हेमाडपंती ॥११॥ ऐशा त्या मंदिरीं । येते झाले साक्षात्कारी । बैसले शिवाच्या गाभारीं । लावोनिया पद्मासन ॥१२॥ गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे । घेऊनिया निघाले साचे । अस्तमानीं गांवाकडे ॥१३॥ मंदिरापुढें तत्त्वतां । एक लहान ओढा होता । तेथें पाणी पाजण्याकरितां । गुरें गुराखी पातले ॥१४॥ कोणी सहज मंदिरांत । गेले वंदण्या शिवाप्रत । तों तेथें पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥१५॥ मुलें म्हणती या मंदिरीं । कोणी न पाहिला आजवरी । पुरुष बसलेला निर्धारी । अस्तमानाचे समयाला ॥१६॥ कांहीं गुराखी बाहेर आले । इतरां बोलावूं लागले । कांहीं तेथेंच बैसले । सत्पुरुषाचे समोर ॥१७॥ परी साधु बोलेना । डोळे मुळींच उघडीना । याचें कारण कळेना । त्या गुराखी अर्भकांसी ॥१८॥ कोणी म्हणती थकलेला । हा साधु दिसतो भला । शक्ति मुळीं नुरली त्याला । बोलावयाकारणें ॥१९॥ कोणी म्हणती उपवासी । असावा निश्चयेसी । थोडी भाकर तयासी । देऊं आपण खावया ॥२०॥ ऐसें म्हणून भाकर । धरली मुखासमोर । भाविक मुळचीं गुराखी पोरें । हलवूं लागलीं समर्थाला ॥२१॥ परी साधु हालेना । मुखीं शब्द बोलेना । म्हणून सार्‍या गुराख्यांना । नवल वाटलें विशेष ॥२२॥ गुराखी आपसांत बोलती । याची मुळीं ना कळे स्थिती । जरी मेला म्हणावा निश्चिती । तरी आहे बसलेला ॥२३॥ अंग ना झालें थंडगार । ऊन आहे साचार । यावरुन हा जिवंत नर । आहे आहे शंका नको ॥२४॥ कोणी म्हणे असेल भूत । मायावी रुप दावित । कोणी म्हणे हें तर सत्य । शिवापुढें ना भूत येई ॥२५॥ कोणी म्हणती स्वर्गीचा । देव हा असावा साचा । लाभ त्याच्या दर्शनाचा । झाला आपणां हेंच भाग्य ॥२६॥ याचें आतां पूजन । करुं अवघे आपण । जा स्नानालागून । पाणी आणा ओढयाचें ॥२७॥ पोरें गेलीं ओढयावरी । गेळ्यामध्यें आणिलें वारी । परमभावें पायांवरी । घालिते झाले समर्थांच्या ॥२८॥ कोणी वन्यपुष्पें आणिलीं । माळ त्यांची तयार केली । कंठामध्यें घातिली । गुराख्यांनीं साधूच्या ॥२९॥ कोणी कांदाभाकर । नैवेद्यार्थ साचार । दिली ठेवून समोर । एका वडाच्या पानावरी ॥३०॥ गुराख्यांनीं केलें नमन । आदरें भाव धरुन । कांहीं वेळ केलें भजन । पुढें बसून समर्थांच्या ॥३१॥ ऐसा आनंद चालला । तों गुराखी एक बोलला । अरे वेळ बहु झाला। चला आतां गांवाकडे ॥३२॥ दिवस गेला मावळून । कां न आलीं रानांतून । मुलें गुरांना घेऊन । ऐसें लोक म्हणतील कीं ॥३३॥ कदाचित्‌ आपणांसी । पाहण्या येतील काननासी । तान्ही वांसरें घरांसी । लागलीं असतील हुंबरावया ॥३४॥ या साधूची हकीकत । आपण सांगूं गांवांत । शहाण्या वडील माणसांप्रत । म्हणजे येईल कळून कीं ॥३५॥ तें अवघ्यांसी मानवलें । गुराखी सर्व निघून गेले । गांवामाजीं कळविलें । मंदिराचें अवघे वृत्त ॥३६॥ पुढें श्रोते प्रातःकाळीं । आली गांवची मंडळी । समर्थांसी पाहाण्या भली । गुराख्यांच्या बरोबर ॥३७॥ जैसा काल होता बसला । तैसाच आतां पाहिला । भाकरीसी ना स्पर्श केला । ती जशीच्या तशीच आहे कीं ॥३८॥ म्हणूं लागले गांवकरी । हा योगी पुरुष कोणी तरी । आहे बैसला मंदिरीं । सांप्रत या शंकराच्या ॥३९॥ कोणी ऐसें बोलले । शिव पिंडीच्या बाहेर आले । आपणां दर्शन द्याया भले । चला नेऊं या गांवांत ॥४०॥ हा समाधी उतरील । तेव्हां कांहीं बोलेल । ती उतरण्या आहे वेळ । त्याला त्रास देऊं नका ॥४१॥ बंगाल देशीं जालंदर । बारा वर्षें झाले स्थिर । समाधीच्या जोरावर । गर्तेमाजीं ख्यात हें ॥४२॥ ऐसी भवति न भवति झाली । एक पालखी आणविली । त्यांत उचलून ठेविली । समर्थांची मूर्ति पाहा ॥४३॥ ग्रामांतील नारीनर । अवघे होते बरोबर । पुढें वाजंत्र्यांचा गजर । होत होता विबुध हो ! ॥४४॥ मधून मधून तुळशीफुलें । पौर टाकीत होते भले । समर्थाचें अंग झालें । गुलालानें लाली लाल ॥४५॥ घंटाघडयाळें वाजती । लोक अवघे भजन करिती । जय जय योगिराज मूर्ति । ऐसें उंच स्वरानें ॥४६॥ मिरवणूक आली गांवांत । मारुतीच्या मंदिरांत । बसविले आणून सद्‌गुरुनाथ । एका भव्य पाटावरी ॥४७॥ तोही दिवस तैसाच गेला । मग लोकांनीं विचार केला । आपण करुं स्तवनाला । उपाशी बसून याच्यापुढें ॥४८॥ ऐसा जो तो विचार करिती । तों आले देहावरती । गजानन श्रीसद्‌गुरुमूर्ति । मुगुटमणी योग्यांचे ॥४९॥ मग काय विचारतां । आनंद झाला समस्तां । प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा । स्वामीचिया चरणांवरी ॥५०॥ नैवेद्याची धूम झाली । ज्यानें त्यानें आणिलीं । पात्रें तीं वाढून भलीं । मारुतीच्या मंदिरांत ॥५१॥ त्या अवघ्यांचा स्वीकार । समर्थें केला थोडाफार । हाळोपाळींत साचार । ही वार्ता श्रुत झाली ॥५२॥ पुढें दुसर्‍या मंगळवारीं । पिंपळगांवचे गांवकरी । आले बाजारा निर्धारीं । शेगांवाकारणें ॥५३॥ ते शेगांवच्या लोकांसी । सहज बोलले प्रेमेसी । आमच्याही गांवासी । आला एक अवलिया ॥५४॥ अवलिया थोर अधिकारी । प्रत्यक्ष आहे श्रीहरी । धन्य पिंपळगांव नगरी । पाय लागले साधूचे ॥५५॥ आम्ही तया योगीवरा । कोठें न जाऊं देऊं खरा । निधि चालत आला घरा । त्यातें कोण दवडी हो ? ॥५६॥ शेगांवचे बाजारांत । जिकडे तिकडे हीच मात । बंकटलाला झालें श्रुत । वर्तमान तें अवलियाचें ॥५७॥ बंकटलाल पत्‍नीसहित । गेला पिंपळगांवांत । समर्थासी जोडोन हात । विनवूं लागला नानापरी ॥५८॥ आतां येतो म्हणून । निघून गेलात आपण । त्यास झाले पंधरा दिन । याचा विचार करा हो ॥५९॥ गुरुराया तुम्हांवीण । भणभणीत दिसे सदन । शेगांवचे अवघे जन । चिंतातुर झाले हो ॥६०॥ गाडी आणिली आपणांसाठीं । चला शेगांवीं ज्ञानजेठी । मायलेका होणें तुटी । हें कांहीं बरें नसे ॥६१॥ कित्येक दयाळा आपुले भक्त । राहिले असती उपोषित । त्या शेगांव शहरांत । नित्य दर्शन घेणारे ॥६२॥ म्ही न आल्या शेगांवीं । मी ही तनु त्यागीन वरवी । आमुची सांगा पुरवावी । आळ कोणी गुरुवर्या ? ॥६३॥ बंकटलाल ऐसें वदले । महाराज गाडीवरी बसले । शेगांवासी निघाले । पिंपळगांवा सोडून ॥६४॥ जैसा मागें गोकुळाला । न्याया कृष्णा अक्रूर आला । तैसा बंकटलाल भासला । अक्रूर पिंपळगांवातें ॥६५॥ पिंपळगांवच्या लोकांप्रती । बंकटलाल समजाविती । नका होऊं दुःखित चित्तीं । जाती न कोठें लांब साधु ॥६६॥ वाटेल तेव्हां दर्शना यावें । हेतु आपुले पुरवावे । जेथल्या तेथें असूं द्यावें । या अमोल मूर्तीला ॥६७॥ बहुतेक पिंपळगांवाचा । बंकटलाल साहुकार साचा । मनोभंग साहूचा । करण्या कुळांची छाती नसे ॥६८॥ चुरमुर्‍याचे लाडू खात । पिंपळगांव बसलें स्वस्थ । महाराज बसून गाडींत । जाऊं लागले शेगांवा ॥६९॥ पथीं जातां गुरुमूर्ति । बोलली बंकटलालाप्रती । ही का साहूची होय रीति । माल दुसर्‍याचा बळें न्यावा ! ॥७०॥ मशी यावया तुझ्या घरीं । भय वाटतें अंतरीं । तुझ्या घरचि नाहीं बरी । रीत हें मी पाहतों ॥७१॥ लक्ष्मी जी लोकमाता । महाविष्णूची होय कांता । जिची असे अगाध सत्ता । तिलाही त्वां कोंडिलें ॥७२॥ तेथें माझा पाड कोण ? । म्हणून गेलों पळोन । जगदंबेचे पाहून । हाल माझें चित्त भ्यालें ॥७३॥ ऐसें ऐकतां हंसूं आलें । बंकटलालाप्रती भलें । विनयानें भाषण केलें । तें ऐका सावचित्तें ॥७४॥ बंकट बोले गुरुनाथा । माझ्या कुलपा न भ्याली माता । आपुला वास तेथें होता । म्हणून झाली स्थीर ती ॥७५॥ जेथें बाळ तेथें आई । तेथें दुज्याचा पाड काई ? । आपुल्या पायापुढें नाहीं । मला धनाची किंमत ॥७६॥ तेंच माझें धन थोर । म्हणून आलों इथवर । माझें न उरलें आतां घर । तें सर्वस्वीं आपुलें ॥७७॥ घरमालकाकारण । शिपाई आडवी कोठून ? । जैसें तुमचें इच्छील मन । तैसेंच तुम्ही वागावें ॥७८॥ इतकीच माझी विनंती । शेगांवीं असो वस्ती । धेनू काननातें जाती । परी येती घरीं पुन्हां ॥७९॥ तसेंच तुम्हीं करावें । अवघ्या जगां उद्धरावें । परी आम्हां न विसरावें । शेगांवीं यावें वरचेवर ॥८०॥ ऐसी समजूत घालून । शेगांवीं आणले गजानन । तेथें कांहीं दिवस राहून । निघून गेले पुनरपि ॥८१॥ ती ऐकावी तुम्ही कथा । सांगतों मी इथें आतां। अडगांव नामें ग्राम होता । एक तया वर्‍हाड प्रांतीं ॥८२॥ त्या ग्रामाकारण । जाया निघाले दयाघन । प्रातःकाळीं चुकवून । नजर शेगांवकरांची ॥८३॥ महाराजांची चालगती । वायुचिया समान होती । अंजनी-तनय मारुती । आला काय वाटे पुन्हां ॥८४॥ मास होता वैशाख । सोळा कलांनीं तपे अर्क । क्वचित्‌ कोठें न राहिलें उदक । ऐसा प्रखर उन्हाळा ॥८५॥ माध्यान्हीच्या समयाला । अकोली गांवापासी आला । हा योगयोगेश्वर साधु भला । गजानन महाराज ॥८६॥ तों काय घडलें वर्तमान । समर्थांसी लागली तहान । करिती चौफेर अवलोकन । तों उदक कोठें दिसेना ॥८७॥ अंगावाटे चालल्या धारा । घामाच्या त्या एकसरा । अधरोष्ठ तो सुकला खरा । उदकाविण समर्थांचा ॥८८॥ ऐशा दुपारच्या अवसरीं । भास्कर नामें शेतकरी । घालीत होता पाळी खरी । आपुल्या त्या शेताला ॥८९॥ शेतकर्‍याची पाहतां स्थिति । हें अवघ्यांत मुख्य असती । कृषीवल हा निश्चिती । अन्नदाता जगाचा ॥९०॥ अंगीं ऐसें मोठेंपण । परी सोशी यातना दारुण । बिचार्‍यांना ऊन ताहान । सोसणें भाग असे कीं ॥९१॥ त्या अकोलीच्या शिवारांत । जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत । एक वेळा मिळेल घृत । परि अभाव पाण्याचा ॥९२॥ आपणांतें प्यावयासी । भास्करानें शेतासी । आणिलें खापराच्या घागरीसी । उदक होतें गांवांतून ॥९३॥ पाठीसी ती भाकर । डोईं जलाची घागर । ऐसा होता प्रकार । शेतामाजीं येण्याचा ॥९४॥ ती घागर झुडुपाखालीं । होती भास्करें ठेविली । त्या ठिकाणीं स्वारी आली । भास्करा जल मागावया ॥९५॥ समर्थ म्हणती भास्कराला । तहान लागली मला । पाणी दे बा प्यावयाला । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥९६॥ पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें । पाण्यावांचून प्राणाचें । रक्षण होणें अशक्य ॥९७॥ धनिक पाणपोया घालिती । हमरस्त्याच्या पथावरती । याचें कारण शोध चित्तीं । म्हणजे येईल कळोन ॥९८॥ भास्कर बोले त्यावर । तूं नंगा धूत दिगंबर । तुला दांडग्या पाजितां नीर । पुण्यलाभ कशाचा ? ॥९९॥ अनाथ-पंगू-दुबळ्यांसाठीं । त्या पुण्याच्या शोभती गोष्टी । वा जो समाजहितासाठीं । झटे त्यासी साह्य करा ॥१००॥ ऐसें शास्त्राचें आहे वचन । तुझ्यासारख्या मैंदाकारण । आम्ही पाजितां जीवन । तें उलटें पाप होय ॥१॥ भूतदयेच्या तत्त्वें भला । सर्प कोणी कां पोसला ? । वा जागा चोरटयाला । देती सदनीं काय कोणी ? ॥२॥ तूं भीक मागून घरोघर । केलेंस पुष्ट शरीर । भारभूत साचार । झालास आपुल्या कृतीनें ॥३॥ मीं माझ्यासाठीं घागर । आणिली सकाळीं डोक्यावर । त्या आयत्या पिठावर । रेघोटया तूं ओढूं नको ॥४॥ तुला ना देणार पाणी । नको करुं रे विनवणी । जा जा करी येथोनी । काळें आपलें चांडाळा ॥५॥ तुझ्यासारिखे निरुद्योगी । जन्मले आमच्यांत जागजागीं । म्हणून झालों अभागी । आम्ही चहूं खंडांत ॥६॥ हें भास्कराचें भाषण । समर्थांनीं ऐकून । थोडें करुनी हास्यवदन । निघोन गेले तेथोनिया ॥७॥ थोडया दूर अंतरावर । एक होती साच विहीर । तिकडे धांव अखेर । घेतली स्वामीरायांनीं ॥८॥ स्वामी तिकडे जाऊं लागतां । भास्कर झाला बोलतां । उच्च स्वरें वेडया वृथा । तिकडे कशाला जातोस ? ॥९॥ ती कोरडी ठणठणीत । आहे विहीर जाण सत्य । पाणी या एक कोसांत । नाहीं कोठें जाण पिशा ॥११०॥ समर्थ बोलले त्यावरी । ही सत्य तुझी वैखरी । विहिरींत पाणी नाहीं जरी । परी करितों प्रयत्‍न ॥११॥ तुझ्यासारखे बुद्धिमान । जलनिं होती हैराण । तें मी नयनीं पाहून । स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥१२॥ तरी समाजहितासाठीं । काय मी केली सांग गोष्टी । साह्य होतो जगजेठी । हेतु शुद्ध असल्यावर ॥१३॥ समर्थ आले विहिरीपाशीं । तों थेंब नाहीं तियेशीं । हताश होऊन वृक्षापाशीं । बसले एका दगडावर ॥१४॥ डोळे मिटून केलें ध्यान । चित्तीं सांठविला नारायण । जो सच्चिदानंद दयाघन । दीनोद्धार जगद्‌गुरु ॥१५॥ समर्थ म्हणती देवदेवा । हे वामना वासुदेवा । प्रद्युम्ना राघवा । हे विठ्ठला नरहरी ! ॥१६॥ देवा ही आकोली । पाण्यावांचून त्रस्त झाली । वोलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून ॥१७॥ मानवी यत्‍न अवघे हरिले । म्हणून तुजला प्रार्थिलें । पाव आतां जगन्माउले । पानी दे या विहिरीला ॥१८॥ तुझी करणी अघटीत । जें न घडें तें घडविसी सत्य । मांजरें जळत्या आव्यांत । पांडुरंगा ! तूं रक्षिलीं ॥१९॥ प्रल्हाद भक्त करण्या खरा । स्तंभीं प्रगटलास जगदोद्धारा । बारा गांव वैश्वानरा । भक्षिलें त्वां गोकुळांत ॥१२०॥ कर नखाग्रीं धरिला गिरी । तूंच कीं रे मुरारी । तुझ्या कृपेची न ये सरी । जगत्रयीं कवणास ॥२१॥ दामाजीपंत ठाणेदार । त्याच्यासाठीं झालास महार । चोख्यासाठीं ओढीलीं ढोरं । पांखरें रक्षिलीं माळ्याचीं ॥२२॥ उपमन्यूसाठीं भला । क्षीरसमुद्र तुवां दिला । तहान नामदेवाला । मारवाडांत लागली जैं ॥२३॥ तैं तुम्ही कौतुक केलें । निर्जलता प्रांतीं भलें । नाम्यासाठीं भरविलें । जल हें आण ध्यानांत ॥२४॥ ऐसें विनवितां ईश्वरा । विहिरीलागीं फुटला झरा । उफाळ्याचा साजिरा । विहीर भरली क्षणामध्यें ॥२५॥ साह्य झाल्या जगन्नाथ । काय एक ना तें होत । ईश्वरी सत्ता अगाध सत्य । जें ना घडे तेंच घडवी ॥२६॥ तेथ पाणी समर्थ प्याले । तें भास्करानें पाहिलें । चित्त त्याचें घोटाळलें । कांहीं नच चाले तर्क त्याचा ॥२७॥ वर्षें झालीं द्वादश । जल नाहीं या विहिरीस । तिलाच एका घटकेस । यानें जलमय केली कीं ॥२८॥ यावरुन हा कोणीतरी । खचित आहे साक्षात्कारी । बळेंच फिरतो पिशापरी । हें आतां समजलें ॥२९॥ शेतीचें काम सोडून । भास्कर आला धांवून । धरितां झाला दृढ चरण । मुखें स्तोत्र आरंभिलें ॥१३०॥ हे नरदेहधारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा । लेंकरासी कृपा करा । अर्भक मी तुमचें असें ॥३१॥ तुम्हांतें ना जाणून । मी बोललों टाकून । आतां पस्तावा झाला पूर्ण । क्षमा त्याची करा हो ॥३२॥ टाकून बोलतां गौळणी । रागावला ना चक्रपाणी । दयाळा बाह्य वेषांनीं । तुझ्या मजला ठकविलें ॥३३॥ त्याचें तूंच निरसन । केलें चमत्कार दाखवून । भगवंताचें देवपण । कृतीनेंच कळलें कीं ॥३४॥ तैसा तुझा अधिकार । केवढा तरी आहे थोर । तें कळलें साचार । या जलाच्या कृतीनें ॥३५॥ कांहीं असो सद्‌गुरुनाथा । मी न सोडी तुम्हां आतां । लेंकरानें भेटतां । माये कोठें न रहावें कीं ॥३६॥ खोटी ही प्रपंच माया । आले आज कळोनिया । आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ॥३७॥

भास्करासी समर्थ म्हणती । ऐसा न होई दुःखित चित्तीं । आतां घागर डोक्यावरती । गांवांतून आणूं नको ॥३८॥ तुझ्यासाठीं हें जीवन । विहिरींत केलें निर्माण । आतां कशाची नुरली वाण । मग का प्रपंच टाकिशी ? ॥३९॥ पाणी आलें तुझ्याकरितां । बगीचा तो लाव आतां । भास्कर म्हणे गुरुनाथा । हें आमीष दावूं नका ॥१४०॥ माझा निश्चय हीच विहीर । कोरडी ठणठणीत साचार । होती दयाळा आजवर । थेंब नव्हता पाण्याचा ॥४१॥ ती विहीर फोडण्याला । तुम्हीच हा प्रयत्‍न केला । साक्षात्काराचा लाविला । सुरुंग खडक फोडावया ॥४२॥ तेणें हा फुटला खडक । भावाचें लागलें उदक । आतां मला निःशंक । भक्तिपंथाचा लावीन मी ॥४३॥ वृत्तीच्या मेदिनी ठायीं । फळझाडें तीं लावीन पाही । सन्नीतीची माझे आई । तुझ्या कृपेंकरुन ॥४४॥ सत्कर्माचीं फुलझाडें । लावीन मी जिकडे तिकडे । हे क्षणैक बैलवाडे । यांचा संबंध आतां नको ॥४५॥ पहा श्रोते संतसंगति । क्षणैक घडतां भास्कराप्रती । केवढी झाली उपरति । याचा विचार करा हो ॥४६॥ खर्‍या संताचें दर्शन । आगळें सर्व साधनांहून । तुकारामें केलें वर्णन । “संतचरणरजा” चे अभंगीं ॥४७॥ तो अभंग पहावा । चित्तीं विचार करावा । आणि त्याचा अनुभव घ्यावा । निजहिताकारणें ॥४८॥ पाणी लागलें विहिरीस । ही वार्ता आसपास । पसरतां जन दर्शनास । धांवूं लागले स्वामीच्या ॥४९॥ मधूचा लागतां सुगावा । जैशा मक्षिका घेती धांवा । वा साखरेचा पाहून रवा । मुंग्या येती धांवून ॥१५०॥ तैसे श्रोते तेथ आले । लोक अपार मिळाले । विहिरीचें पाणी पाहिलें । पिऊन त्यांनीं तेधवां ॥५१॥ उदक निर्मळ शीत मधुर । गोड अमृताहून फार । करुं लागले जयजयकार । गजाननाचा लोक सारे ॥५२॥ असो पुढें भास्करासहित । अडगांवासी न जातां परत । महाराज आले शेगांवांत । श्रीगजानन सिद्धयोगी ॥५३॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । होवो जगासी आदर्शभूत । संतमहिमा जाणावया ॥१५४॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏