श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय १०

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया । सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥ देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं । माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥ माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून । फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य नसे ॥३॥ ऐसी स्थिति आहे जरी । परि देवा कृपा करी । ओहळास गोदावरी । पोटीं आपल्या घेतसे ॥४॥ तैसें तुवां करावें । दुःख अवघें निवारावें । पातकाला न उरुं द्यावें । माझ्या ठायीं यत्किंचित्‌ ॥५॥ तूं आणिल्या मनांत । अवघेंच कांहीं घडून येत । रंकाचाही राव होत । तुझा लाधतां वशीला ॥६॥ असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी । जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥७॥ हा आत्माराम भिकाजी-सुत । उमरावतीचा असे प्रांत । मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥८॥ कायस्थ प्रभू याची जात । हा संतांचा प्रेमी अमित । सदाचारसंपन्न गृहस्थ । गृहस्थाश्रमीं वर्ततसे ॥९॥ त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिले । मंगलस्नान घातिलें । उष्णोदकानें गजानना ॥१०॥ उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं । वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥११॥ कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा । भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥१२॥ कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार । दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥१३॥ धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली । दर्शनालागीं दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥१४॥ प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें । यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥१५॥ इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्याची मनीषा पुरली । सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥१६॥ तें ज्यांच्यापासीं होतें । समर्थ गेले तेथें तेथें । कां कीं साधूस अवघें कळतें । अंतर्ज्ञानें करुन ॥१७॥ गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ बडे । वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१८॥ दादासाहेब यांप्रत । म्हणत होते वर्‍हाडांत । हा सज्जन भाविक अत्यंत । ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी ॥१९॥ त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं । तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥२०॥ गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायतवाणी । चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥२१॥ ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला । कसेंही करुन घराला । पाहा विनंति करुन ॥२२॥ आपुलें निष्पाप असल्या मन । याच्या आगमनें करुन । होईल आपलें पवित्र सदन । भाविकाचा देव असे ॥२३॥ गणेश आप्पा म्हणे तिला । वेड लागलें आहे तुला । हा सदनीं साधु न्यावयाला । वशिला पाहिजे बलवत्तर ॥२४॥ पाहा खापडर्यालागुनी । हा साधु न्यावया सदनीं । श्रम पडले ते आण ध्यानीं । उगा हट्ट धरुं नको ॥२५॥ चंद्राबाई म्हणे नाथा । हें न पटे माझ्या चित्तां । सांगे माझी मनदेवता । सदनीं साधु येतील हो ॥२६॥ तुम्ही करा हो त्यांना नुसती । सदनीं येण्यास विनंति । गरीबावरी असते प्रीति । संतांची ती विशेष ॥२७॥ परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना । बोलावयासी निजसदना । श्रीगजानन साधुतें ॥२८॥ महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर। तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥२९॥ तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांहीं वेळ बसावें । अरे चित्तीं असेल तें बोलावें । भीड न धरितां कवणाची ॥३०॥ ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता । हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवे ॥३१॥ समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं । आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ॥३२॥ असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतींत । त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥३३॥ तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा । राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥३४॥ तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला । भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥३५॥ त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान । म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥३६॥ प्रपंच अवघा अशाश्वत । त्यांत कशाला गोवूं चित्त । केला आजपर्यंत । तोच आतां पुरे झाला ॥३७॥ कांहीं असो आजपून । मी न सोडी त्याचे चरण । अमृताला टाकून । विष प्याया कोणी जावें ? ॥३८॥ म्हणून प्रत्येक पूजेला । बाळाभाऊ हजर भला । होता बुध हो राहिला । दुसरें न कांहीं कारण ॥३९॥ असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी । मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोठयाच्या ॥४०॥ त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस । गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥४१॥ बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची । त्यांनीं जागा मळ्याची । सोडिली हें समजलें ॥४२॥ म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य । महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥४३॥ डोळ्यांतून वाहे पाणी । खंड त्याला नसे जाणी । वस्त्र टाकलें भिजवोनी । त्या अश्रूंनीं छातीचें ॥४४॥ तैं महाराज वदले पाटलाला । ऐसा कां रे रडसी भला ? । शोक कोणता तुला झाला ? । तें वेगें सांग मज ॥४५॥ पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर । महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥४६॥ ऐसा अक्षम्य कोणता । अपराध झाला सांगा आतां । माझ्याकडून ज्ञानवंता । मी लेकरुं आपुलें असे ॥४७॥ ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची । एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥४८॥ मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं । तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥४९॥ कां कीं तुम्हांवांचून । मला न कांहीं प्रिय आन । हें कळलें वर्तमान । अवघ्या पाटील मंडळीतें ॥५०॥ तेही तेथें धांवून आले । महाराजा विनवूं लागले । निजसदना या या भले । हरी आणि नारायणा ॥५१॥ महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी । येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥५२॥ तें पुढें येईल कळोन । आतां न करा भाषण । वाद दोघांचें निर्मूलन । करील हें विसरुं नका ॥५३॥ जितके जगीं जमेदार । तितके न करिती विचार । मागचा पुढचा साचार । हेंच उणें त्यांच्या ठायीं ॥५४॥ जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसीं । मी सोडितां तत् गृहासी । तो नाहीं रागावला ॥५५॥ तें कां हें त्यासी विचार । माझी कृपा तुमच्यावर । आहे ती न ढळणार । कोणत्याही कारणांनीं ॥५६॥ बंकटलालही आला तेथ । घालूं लागला समजूत । यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यांत । तुम्ही यांना नेऊं नका ॥५७॥ माझ्या घरुन जेव्हां आले । तेव्हां सांगा मीं काय केलें । आपण आहोंत त्यांचीं बाळें । ते सारखे अवघ्यांना ॥५८॥ सखाराम आसोलकार । आहे मनाचा उदार । तो जागा देण्यास इन्‌कार । करणार नाहीं वाटतें ॥५९॥ सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा । म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥६०॥ समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं । परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥६१॥ समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार । भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥६२॥ रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी । हे पांच पांडव श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥६३॥

वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची । पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित्‌ आपुल्या ॥६४॥ पत्रें येती वरच्यावरी । बाळाभाऊस येण्या घरीं । परी परिणाम अंतरीं । कांहींच त्याच्या होईना ॥६५॥ भास्कर म्हणे गुरुराया । हा सोकला पेढे खाया । म्हणून ना इच्छी जाया । आपल्यापासून कोणीकडे ॥६६॥ तुम्ही द्यावा यातें मार । म्हणजेच हा जवळ करील घर । रत्‍न चौदावें पाहिल्याबिगर । हा येथून हलणें नसे ॥६७॥ लकडीवांचून माकड । पाहा न होई कधीं धड । मोठमोठाले ते पहाड । भिऊं लागती वज्राला ॥६८॥ एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण । परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥६९॥ बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी । कां रे आम्हां त्रास देसी ? । येथें येऊन वरच्यावर ॥७०॥ ओढाळ बैल हिरव्यावर । पाहे पडाया निरंतर । त्यास जरी दिला मार । तरी तो येई तेथ पुनः ॥७१॥ तैसी लोचटा तुझी कृति । तंतोतंत निश्चिति । झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ॥७२॥ हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपलें जाण । त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥७३॥ एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती । ती गजाननें घेऊनी हातीं । बाळास झोडूं लागले ॥७४॥ मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली । मग एक मोठी घेतली । भरीव काठी वेळूची ॥७५॥ तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले । कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥७६॥ परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला । कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥७७॥ भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार । परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥७८॥ तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी । मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥७९॥ जैसा का तो कुंभार । माती तुडवितो साचार । तैसाच केला प्रकार । महाराजांनीं तुडविण्याचा ॥८०॥ मठीं हा प्रकार चालला । शिष्यसमुदाय पळत सुटला । कोणी गेले बोलावण्याला । त्यांच्या आवडीच्या मंडळीस ॥८१॥ बंकटलाल कृष्णाजी । धांवूनी आले मठामाजीं । समर्थ हात धरण्या राजी । कोणी तयार होईना ॥८२॥ बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त । पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥८३॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून । हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥८४॥ मी न बाळासी मारिलें । नाहीं तयासी तुडविलें । निरखून पहा चांगलें । म्हणजे येईल कळोनी ॥८५॥ महाराज म्हणाले बाळासी । ऊठ वत्सा वेगेसी । या आलेल्या मंडळीसी । आंग तुझें दाखिव ॥८६॥ ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला । लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥८७॥ तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं । तो पहिल्यापरीच होता पाही । निमग्न आपुल्या आनंदांत ॥८८॥ त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला । मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेंवांकुडें बाळासी ॥८९॥ सोनें कसासी उतरतें । तेव्हांच त्याची किंमत कळते । आश्चर्य झालें समस्तांतें । तो प्रकार पाहून ॥९०॥ सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला । श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥९१॥ तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें । सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥९२॥ वाटेल त्याच्या दुकानांत । गाईनें शिरावें अवचित । धान्याचिया टोपल्यांत । तोंड आपुलें खुपसावें ॥९३॥ वाटेल तितुकें यथेच्छ खावें । राहिलेलें नासावें । तेल तुपाचें लवंडावें । पिंप अंगाच्या धक्क्यानें ॥९४॥ घरीं बांधून ठेवितां । चर्‍हाटें तोडी हां हां म्हणतां । सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥९५॥ ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण । लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥९६॥ गाभण मुळींच होईना । कास कधींच करीना । कोंडून ठेवितां राहीना । घरामाजीं कोठेंही ॥९७॥ लोक म्हणती सुकलालाला । दे या खाटकास गाईला । किंवा मारुन टाका तिला । तूंच गोळी घालून ॥९८॥ सुकलाल म्हणे लोकांसी । तुम्हीच मारुन टाका तिसी । वाटेल त्या प्रयत्‍नासी । करुन या विबुध हो ॥९९॥ एका पठाणानें तिला । मारण्याचा यत्‍न केला । गोळी भरुन बंदुकीला । टपून बैसला होता हो ॥१००॥

तें कसें काय कोण जाणे । कळलें गाईकारणें । तिनें येऊन शिंगानें । पठाण पाडिला उताणा ॥१॥ मी परगांवा नेऊन । दिली होती सोडून । परी ती आली परतून । त्याला सांगा काय करुं ॥२॥ ऐसें ऐकतां लोक म्हणती । आतां याला एक युक्ति । गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥३॥ तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला । अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥४॥ साधूस गाय दिल्याचें । पुण्य तुला लाभेल साचें । आणि संकट आमुचें । टळेल बापा त्यायोगें ॥५॥ तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें । तिला धरण्यासाठीं केले । प्रयत्‍न नानापरीचे ॥६॥ एकही यत्‍न नाहीं फळला । शेवटीं एक्या पटांगणाला । हरळकुंद्याचा ढीग केला । सरकी ठेवली शेजारीं ॥७॥ ती खायालागून । गाय आली धांवून । ती येतां फांस टाकून । धरिली दहावीस जणांनीं ॥८॥ साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी । आणिली शेगांवा भीतरीं । गजाननासी द्यावया ॥९॥ जवळ शेगांव जसें जसें । येऊं लागलें तसें तसें । स्वभावांत पडलासे । त्या गाईच्या पालट ॥११०॥ समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी । तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥११॥ महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा । गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥१२॥ चारही पाय बांधलेत । गळां साखळदंड लाविलेत । शिंगांचीही तीच गत । केली चर्‍हाटें काथ्याच्या ॥१३॥ ऐसा मोठा बंदोबस्त । शोभतसे वाघिणीप्रत । ही गाय बिचारी साक्षात् । तिला न ऐसें करणें बरें ॥१४॥ अरे खुळ्यांनो, ही गाय । अवघ्या जगाची आहे माय । तिला बांधिलें हाय हाय । केवढा कठीण प्रसंग आला ॥१५॥ तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत । परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥१६॥ जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें । आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥१७॥ बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली । पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥१८॥ खालीं घालूनिया मान । प्रदक्षिणा त्या केल्या तीन । समर्थांचे दिव्य चरण । चाटूं लागली जिभेनें ॥१९॥ ऐसा प्रकार तेथें झाला । तो अवघ्यांनीं पाहिला । समर्थांच्या प्रभावाला । शेषही वर्णूं शकेना ॥१२०॥ समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास । तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥२१॥ ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार । उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥२२॥ बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली । गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥२३॥ त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्‍हाट जाण । सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥२४॥ अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते । जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥२५॥ असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा । विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥२६॥ त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत । परि न आला गुण किंचित्‌ । खर्च सारा व्यर्थ गेला ॥२७॥ त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकिली होती । म्हणून सहपरिवारें सत्वर गती । आला शेगांवाकारणें ॥२८॥ रोगव्यथेनें चालवेना । श्रोते तया लक्ष्मणा । दोघांतिघांनीं उचलून जाणा । आणिले त्या मठांत ॥२९॥ करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर । त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥१३०॥ आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या । माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥३१॥ अमृताचें दर्शन । होतां कां यावें मरण । माझ्या कुंकवालागून । टिकवा हीच विनंती ॥३२॥ त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी । तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥३३॥ जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया । तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति-परायण ॥३४॥ यापुढें न कांहीं वदले । चिलीम ओढूं लागले । श्रीगजाननस्वामी भले । आपुल्या मठांत शेगांवीं ॥३५॥ भास्कर म्हणे ’अहो बाई । आतां न बसा ये ठाईं । आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥३६॥ प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थ-करीं प्राप्त झाला । तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥३७॥ यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम । लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच’ ॥३८॥ बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला । प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥३९॥ निजगृहीं जोडपें आलें । आप्त पुसूं लागले । शेगांवांत काय घडलें । तें सांगावें साकल्यें ॥१४०॥ बाईनें अवघें वर्तमान । कळविलें लोकांलागून । आंब्याचा तो प्रसाद म्हणून । दिला समर्थें मजलागीं ॥४१॥ आणि आज्ञा केली वरी । खाऊं घाला अत्यादरीं । आंबा प्रसाद निजकरीं । आपुल्या त्या पतीला ॥४२॥ त्याप्रमाणें मींही केलें । आज सकाळीं खाऊं घातलें। हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तईं त्या वाटलें वाईट ॥४३॥ अहो बाई तुम्ही काय । केलेंत हें हाय हाय । आंबा हेंच कुपथ्य होय । या पोटांतील रोगाला ॥४४॥ माधवनिदानीं हेंच कथिलें । सुश्रुतांनींही वर्णिलें । निघंटानें कथन केलें । शारंगधर म्हणे ऐसेंच ॥४५॥ तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला । पत्‍नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥४६॥ ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले । जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्‍नीस ॥४७॥ परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य । रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेलें हो ॥४८॥ शौच्यावाटें व्याधि गेली । हळुंहळूं शक्ति आली । पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥४९॥ निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी । तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥१५०॥ लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर । म्हणे महाराजा माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥५१॥ मी आलों त्याचसाठीं । चला कारंज्यास ज्ञानजेठी । मला न करा हिंपुटी । नाहीं ऐसें म्हणूं नका ॥५२॥ आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला । तेधवां होते संगतीला । शंकर-भाऊ पितांबर ॥५३॥ घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिली । अवघी संपत्ति आपुली । आहे मी कोण देणार ? ॥५४॥ परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य । महाराज बघून त्याप्रत । ऐशा रितीं बोलले ॥५५॥ म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? । लक्ष्मणा ऐसे चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥५६॥ मला दिले तूं आपलें घर । आतां उघडीं अवघीं दारें । फेकून देई रस्त्यावर । अवघीं कुलपें येधवां ॥५७॥ लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला । परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥५८॥ भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर । खजिन्याच्या उमर्‍यावर । स्वतः जाऊन बैसला ॥५९॥ आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें । ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥१६०॥ हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन । बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥६१॥ जैसें कडू वृंदावन । वरुन पाहतां दिसे छान । परी अंतरीं कडवटपण । पूर्ण त्याच्या भरलें असे ॥६२॥ सोडून त्याच्या घरासी । उपासी निघाले पुण्यरासी । दांभिकाच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥६३॥ तेथें त्याच्या घराची । वा धनदौलतीची । गरज समर्था नव्हती साची । ते वैराग्याचे सागर ॥६४॥ परी तो जें कांहीं बोलला । त्याचा सत्यपणा पाहिला । खोटेंपणाचा राग आला । म्हणून गेले उठोन ॥६५॥ जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें । भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥६६॥ मी कृपा करावया । आलों होतों या ठायां । याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी तें न तुझ्या प्रारब्धीं ॥६७॥ तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत । अवघी लक्ष्मी झाली फस्त । त्या भिक्षेची वेळ आली ॥६८॥ म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् । याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडून आणिलें ॥६९॥ श्रीगजानन चिंतामणी । त्या गार काय शोभा आणी ? । वा सुवर्णालागुनी । भूषवावें का कथिलानें ? ॥१७०॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । श्रीगजाननविजय नामें ग्रंथ । सदा भाविक परिसोत । निज कल्याण व्हावया ॥१७०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏